- सतीश पाटणकर
गणेश वासुदेव (Ganesha Vasudev) तथा दादासाहेब मावळंणकर हे १९५२ ला स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर (Ahmedabad Loksabha) निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. ग. वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून, त्यांचे मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय.
त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. दादासाहेबांचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Pandarapura Vittala Temple) सर्वांना मुक्त प्रवेश मिळण्यासाठी केलेली शिष्टाई. पंढरपूरचा विठ्ठल उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. अठरापगड जातीच्या संतांनी विठूच्या नामाचा गजर करत भागवत धर्माची पताका भिवरेच्या वाळवंटात भावभक्तीने फडकवली; मात्र विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मात्र सवर्णांनाच होता.
साने गुरूजींनी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली. देशाचे स्वातंत्र्य दारी आले होते; मात्र १ मे १९४७ ला गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी आमरण उपोषण सुरू केले. महात्माजींनी उपोषण थांबवण्याची केलेली विनंती अव्हेरून गुरुजींनी निर्धाराने उपोषण सुरू ठेवले. अखेर महात्माजींचा गैरसमज दादासाहेब मावळकरांनी दूर केला. महात्माजींनी दादासाहेबांना पंढरपूरला जायला सांगितले. परंपरावादी पुजारी निग्रहाने गुरूजींची मागणी नाकारत होते. ‘जावो साने सीमापारी नही खुलेगा मंदिरद्वार’, अशा घोषणा देत होते. दादासाहेब पंढरपूरला आले.
पुजारी मंडळींना परोपरीने समजावले आणि अखेर १० मे १९४७ ला मंदिर प्रवेशाला सर्वांना मुक्तद्वार देऊन गुरूजींनी उपोषणाची सांगता केली. यासाठी दादासाहेबांचे मोठे योगदान लाभले. दादासाहेब अहमदाबादला राहात होते तरी त्यांना महाराष्ट्राचा आणि मराठीचा अभिमान होता. त्यांचे मूळगाव संगमेश्वर तालुक्यात. त्यामुळे इथल्या अनेकांशी त्यांचा परिचय होता. १९२७ ला देवरूख येथील स्थापन झालेल्या ‘देवरूख शिक्षण प्रसारक संस्थेच्या’ स्थापनेत काकासाहेब पंडित, दादासाहेब सरदेशपांडे, विनायकराव केतकर आदींबरोबर दादासाहेब मावळंकरही होते.
त्यांच्या पत्नी सुशिलातार्इ याही स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. २७ फेब्रुवारी १९५६ ला त्यांचे निधन झाले. श्रीमती सुशिला मावळंकर या दादासाहेबांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर बिनविरोध लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. पहिली महाराष्ट्र विधानसभा आणि पहिली लोकसभा यांचे अध्यक्षपद भूषवले कोकणच्या सुपुत्राने गणेश वासुदेव तथा दादासाहेब मावळंकर यांनी, याचा निश्चितच अभिमान वाटतो.
(लेखक मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.