Loksabha Election 2024 : ‘व्होट जिहाद’ हीच ‘इंडिया’ची रणनीती ; आणंदमधील सभेत पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी मरिया आलम यांनी ‘व्होट जिहाद’बाबत केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘इंडिया’ आघाडीला धारेवर धरले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

नवी दिल्ली-आणंद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी मरिया आलम यांनी ‘व्होट जिहाद’बाबत केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘इंडिया’ आघाडीला धारेवर धरले. या महिला नेत्याच्या वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती स्पष्ट होते, हाच त्याचा कट असल्याचा टोला त्यांनी लगावला. ते आणंद येथे आयोजित सभेत बोलत होते. ‘शहजादे पंतप्रधान व्हावेत म्हणून पाकिस्तान उतावीळ झाला आहे,’ असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीने मुस्लिमांना ‘व्होट जिहाद’चे आवाहन केले आहे. ज्या व्यक्तीने याबाबत भाष्य केले आहे, ती व्यक्ती मदरशातून शिकून बाहेर पडलेली नाही, तर एका उच्चशिक्षण संस्थेमध्ये ती शिकलेली आहे. इंडिया आघाडी सर्व मुस्लिमांना मतदानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. विरोधकांच्या या आघाडीने लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान केला आहे. मरिया आलम यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने निषेध केलेला नाही. ‘इंडिया’ आघाडीने मोठ्या चतुराईने रणनीती आखली आहे. एका बाजूला ते अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण गटामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून, दुसऱ्या बाजूला ते ‘व्होट जिहाद’च्या नावाने घोषणा देऊ लागले आहेत. यावरून त्यांचे इरादे किती धोकादायक आहेत हे दिसून येते.’’

Loksabha Election 2024
Kalyan Loksabha: ठाकरे गटाच्या उमेदवाराचा ताप वाढला; कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे व्हिटॅमिन मिळेना

मोदी म्हणाले, ‘‘विरोधी पक्षांची पाकिस्तानशी भागीदारी आहे. काँग्रेसचे सरकार हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना डोझियर पाठविण्याचे काम करत असे, पण मोदी सरकारने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. हा योगायोग पाहा. काँग्रेस येथे मरत असताना पाकिस्तान गळा काढून रडत आहे. शहजाद्यांनी या देशाचे पंतप्रधान व्हावे असे पाकिस्तानला वाटते, तसेही काँग्रेसचे नेते पाकिस्तानचे चाहते आहेत.’’

नेमका वाद कशामुळे?

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे आयोजित सभेत बोलताना मरिया आलम यांनी मतदारांना ‘व्होट जिहाद’चे आवाहन केले होते. येथील समाजवादी पक्षाचे उमेदवार नवलकिशोर शाक्य यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. ‘‘या सरकारला घालवायचे असेल तर केवळ व्होट जिहाद हाच एकमेव मार्ग असून लोक म्हणतात राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे, पण मी म्हणेन की मानवतेलाच धोका निर्माण झाला आहे,’’ असे विधान मरिया आलम यांनी केले होते.

गुन्हा दाखल

दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मरिया आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय फौजदारी संहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सलमान खुर्शीद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिहाद हा प्रतिकूल परिस्थितीविरोधातील लढा असतो. राज्यघटनेच्या संरक्षणासाठी ‘व्होट जिहाद’ पुकारण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

- सलमान खुर्शीद,

काँग्रेसचे वरिष्ठ नेते

मरिया आलम यांच्या व्हायरल व्हिडिओचा आम्ही अभ्यास केला असून, धर्माच्या आधारावर मते मागून त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसते.

- विकासकुमार,

वरिष्ठ पोलिस अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com