सांगली : ‘‘जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी संपवली, जुने वाद मागे सोडले. मी आणि विशाल एक झालो. सांगलीची काँग्रेस एकसंध झाली, मात्र कधी कधी चांगले घडत असताना दृष्ट लागते. काँग्रेसच्या एकीला दृष्ट लावली गेली, मात्र दृष्ट लावणाऱ्यांचा वचपा काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,’’ असा घणाघात आमदार विश्वजित कदम यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सांगलीच्या जागेबाबत ज्यांनी दृष्टी लावली त्यांची दृष्ट उतरवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,’’ असे सांगत विश्वजित कदम यांच्या भूमिकेला साथ दिली.
येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिराच्या पटांगणात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत झालेल्या ताणाताणीचा लेखाजोखा मांडताना ‘सांगली सोडणं ही चूकच होती’, याची उघड कबुली दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी व्यासपीठावर होते. ‘तुम्ही सांगलीसाठी खूप प्रयत्न केले, मात्र कोणीतरी काहीतरी करत होते, यावर तुमचं बारीक लक्ष का नव्हतं’, अशा शब्दांत विश्वजित यांनी उपस्थित नेत्यांना सवाल केला.
नाना पटोले म्हणाले, ‘‘सांगलीबाबत जे घडले त्याचे दुःख मलाही आहे. सांगली मिळाली नाही, एका चक्रव्यूहात नाना फसला, मात्र आता फसणार नाही. हा चक्रव्यूह कसा भेदायचा हे मला चांगले माहिती आहे. ही लढाई वेगळी आहे. भाजप सरकारला आपण माफ करू शकत नाही. तुमच्या भावनांचा आदर आहे, मात्र महाविकास आघाडी म्हणून काम करावे लागेल. हाताच्या पंजानेच मशाल पकडावी लागते. कोमेजलेले फूल हाकलावे लागेल.’’
सांगलीबाबत मोठे राजकारण घडले, हळू हळू सगळे पुढे येईल. तीन पक्षांची आघाडी झाल्याने काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या. त्याची किंमत सांगलीला मोजावी लागली. सांगलीसाठी न भूतो असा संघर्ष झाला. विश्वजितने नेटाने किल्ला लढवला.
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.