मुंबई : ‘‘झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांनाही शाश्वत विकासाचा अधिकार आहे. भारताच्या विकासात झोपडपट्टीवासीयांचा मोठा सहभाग आहे. ‘जिथे झोपडी तिथेच घर’ हेच झोपडपट्टी पुनर्वसनाचे धोरण असायला हवे. भाजप झोप़डपट्टीवासीयांना उचलून मिठागरांच्या, खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे. भाजपचा हेतू ‘गरीबी हटाव’ नसून ‘गरीब को हटाव’ असा असल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
‘मातोश्री’ येथे आदित्य ठाकरे यांची शनिवारी पत्रकार परिषद झाली. भाजपचे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल यांच्या ‘झोपडपट्ट्या शहरातून काढल्या पाहिजेत आणि त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात, या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला.
भाजपच्या धोरणावर बोट ठेवत ते म्हणाले, ‘‘पीयूष गोयल यांनी अचानक मुंबई उत्तरची जागा लढवण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ असा नाही की तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल. झोपडपट्टीवासीयांना शाश्वत विकासाचा अधिकार आहे. भारताच्या विकासात त्यांचाही मोठा सहभाग आहे.’’
२०२२ पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर दिले जाईल, असे भाजपने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नसल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. ‘‘भाजपचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा आहे. मात्र आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचे ‘बिल्डर लॉबी’पासून संरक्षण करू,’’ असे आश्वासन त्यांनी दिले. उत्तर मुंबईप्रमाणे धारावीही भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचा डाव आहे. झोपडपट्टीतील कामगार वर्ग निवडणूक रोखे विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- आदित्य ठाकरे, आमदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.