Western Maharashtra : मतदारांचा महायुतीसोबत ‘असहकार’

महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वाधिक काळ नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राने केले. सहकार, शिक्षण आणि त्याभोवतीचे राजकारण अशी पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्याची ओळख. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राने निकालाला पूर्ण कलाटणी दिल्याचे चित्र आहे.
Western Maharashtra
Western Maharashtra sakal

महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वाधिक काळ नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राने केले. सहकार, शिक्षण आणि त्याभोवतीचे राजकारण अशी पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्याची ओळख. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राने निकालाला पूर्ण कलाटणी दिल्याचे चित्र आहे. अहमदनगरपासून सोलापूरपर्यंतच्या लोकसभेच्या जागांमध्ये अपवाद वगळता सगळीकडेच महाविकास आघाडीची सरशी झाल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसते.

महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या प्रयोगाला पहिला प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून मिळाला होता. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि राजकारणच पूर्णपणे बदलून गेले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राबद्दल यंदाच्या निकालाबाबत विशेष कुतूहल होते.

पक्ष फुटीनंतर बदललेल्या समीकरणांत लोकसभेला येथील पारंपरिक विरोधक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसोबत होते. या संपूर्ण भागाच्या राजकारणावर सहकाराचा आणि सहकार क्षेत्राच्या लाभार्थ्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भारतात पहिल्यांदाच ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करून या भागातील कारखानदारांना आणि पर्यायी या भागातील राजकारणाला प्रभावित करण्याचा प्रयत्नही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून झाला. मात्र रखडलेले प्रकल्प, स्थानिक खासदारांबद्दलची नाराजी, मराठा आरक्षणाचा विस्कळित झालेला मुद्दा अशा अनेक कारणांनी भाजपबद्दलची नाराजी वाढतच गेली. पक्ष फुटींनंतर शरद पवार-उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती बाळगणारा हा सारा भाग होता. या दोन्ही नेत्यांनी समन्वयाने आखलेली रणनीती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविषयी दाखवलेला विश्वास पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या यशाचे गणित उलगडून दाखवणारा ठरला आहे.

Western Maharashtra
Loksabha Election Result : मुसळधार पावसात भाजपचा जल्लोष ; ‘काय म्हणतात पुणेकर, निवडून आले मुरलीधर’

असा लागला निकाल

पश्चिम महाराष्ट्रात यावेळी कोल्हापूरची जागा शिवसेनेऐवजी काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन लढवली. तिथे शिवसैनिकांची साथ आणि काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या निवडणूक तंत्राने बाजी मारली. हातकणंगलेमध्ये अत्यंत चुरशीची चौरंगी लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या पथ्यावर पडली. सांगलीत मविआमध्ये बेबनाव झाला खरा; पण अपक्ष विशाल पाटील यांना सुरुवातीपासूनच इथे आघाडी मिळाली होती, जी निकालापर्यंत कायम राहिली.

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी संपूर्णपणे एकहाती निवडणूक लढवून यश पदरात पडून घेतले. माढ्यामध्ये शरद पवार यांच्या गणिताला यश मिळून धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. साताऱ्यात राष्ट्रवादीने चांगली लढत दिली, पण कराड दक्षिणमध्ये भाजपला मिळालेले मताधिक्य शिंदे यांना मोडून काढता आले नाही.

पुणे जिल्ह्यात मावळचा गड शिंदेंच्या शिवसेनेने आणि पुण्याचा गड भाजपने राखला. पण प्रतिष्ठेच्या बारामती आणि शिरूरमध्ये मात्र पालकमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाने अजित पवारांच्या राजकीय भवितव्याची रास्त शंका उपस्थित झाली आहे. शरद पवारांच्या हातून पक्ष काढून घेऊनही अजित पवार यांना पवारांचा वारसदार बनणे शक्य झालेले नाही, हे बारामतीतील पराभव सांगतो आहे.

अहमदनगरमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत नीलेश लंके यांनी सुजय विखे यांना पराभवाची धूळ चारली तर शिर्डीमध्ये अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदारांच्या नाराजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेने निवडणूक हातात घेतली की भलेमोठे दावे फोल ठरतात, याचा अनुभव पश्चिम महाराष्ट्रात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com