Loksabha 2019 : सेनापतीविना काँग्रेसची वाटचाल!

Congress
Congress

सातारा - ऐन लोकसभा निवडणुकीत इतिहासात प्रथमच साताऱ्यातील काँग्रेस सेनापतीविना वाटचाल करत आहे. जिल्हाध्यक्षाने भाजपमध्ये जाताना सहा तालुकाध्यक्षांना पदावरून दूर केले आहे. त्यामुळे सहा तालुक्‍यांतील कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणीही आता नामधारीच आहे. काँग्रेसचे वस्त्रहरण होत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र पितामह भीष्मांच्या भूमिकेत का राहिले आहेत, असा प्रश्‍न काँग्रेसचे पदाधिकारी विचारू लागले आहेत. किमान निवडणुकीच्या कालावधीत तरी नामधारी सेनापती नेमण्याची भूमिका श्री. चव्हाण यांनी घ्यावी, अशी अपेक्षा समस्त काँग्रेसजन करू लागले आहेत.

काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या कालावधीपासूनच इतिहास आहे. सुरवातीपासून सातारा जिल्ह्याने काँग्रेसला दिग्गज नेते मंडळी दिली. रामानंद भारती हे काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. ते बराच काळ या पदावर राहिले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली. त्यामध्ये किसन वीर, विलासराव पाटील-उंडाळकर, दत्ताजीराव बर्गे, भि. दा. भिलारे गुरुजी, अरुण बागल, मदन भोसले, आनंदराव पाटील आदींचा यामध्ये समावेश होतो. पण, यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसची वाटचाल जिल्हाध्यक्षाविना म्हणजे सेनापतीविना सैन्याची वाटचाल सुरू आहे. आमदार आनंदराव पाटील यांनी सर्वाधिक काळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्यानंतर फलटण तालुक्‍यातील रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना जिल्हाध्यक्ष केले. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर श्री. निंबाळकरांनी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची प्रतिज्ञा घेतली. पण, या प्रतिज्ञेतील पहिले वाक्‍य पूर्ण होते ना होते तोच त्यांनी माढा मतदारसंघातील उमेदवारी मिळणार, या एकमेव कारणातून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जाण्यापूर्वी वाईचे माजी आमदार मदन भोसले भाजपमध्ये गेले.

त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या सहा तालुकाध्यक्षांना रणजितसिंह निंबाळकरांनी निलंबित केले. त्यामुळे या कार्यकारिणी बरखास्त झाल्या. तसेच स्वत:ही भाजपमध्ये गेले. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त झाल्यासारखीच परिस्थिती आहे. 

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी असून, साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारात काँग्रेसची काही मंडळी व्यस्त आहेत. पण, आघाडी धर्म पाळत असताना काँग्रेसच्या नेत्यांना आपला जिल्हाध्यक्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये गेल्याची सल आहे. जिल्हाध्यक्षाविनाच काँग्रेसची सुरू असलेली वाटचाल सर्वांच्या मनाला बोचत आहे. हे सर्व होऊनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबत कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत. महाभारतातील पितामह भीष्माची भूमिका त्यांनी घेतल्याचीही प्रतिक्रिया काही पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com