Loksabha 2019 : सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठीच मतदानकाळ लांबवल्याची टीका 

Loksabha 2019 : सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठीच मतदानकाळ लांबवल्याची टीका 

मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली, तरी 2014 प्रमाणे युतीसाठी ही निवडणूक सहज नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही बेरजेचे राजकारण करत लहान-मोठ्या पक्षांसोबत आघाडीची मोट बांधली आहे. त्यातच विविध जातीसमूह आणि शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी वातावरण आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकताना भाजपला कसरत करावी लागेल. 

महाराष्ट्रातील चार टप्प्यांतील मतदारसंघ लागून असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघासाठी मतदान होईल. विदर्भात भाजपला फारसा त्रास जाणवत नसल्याने हा टप्पा सहज उरकून 18 एप्रिलला मतदान होणाऱ्या बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूरच्या जागेसाठी पहिल्या टप्प्यातील सर्व कार्यकर्ते प्रचारात धुमशान करतील, असे मानले जाते. 

तिसरा टप्पा निर्णायक मानला जातो. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात बाजी मारणाऱ्या पक्षाचे महाराष्ट्रात वर्चस्व राहील, हे निर्विवाद आहे. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले अधिक आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फौज उतरणार आहे. 

भाजपचा सर्वाधिक भर मुंबई व परिसरातील शहरी मतदारसंघावर असल्याने अखेरच्या टप्प्यात धुमश्‍चक्रीचे संकेत आहेत. या टप्प्यातील नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्‍चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरूर आणि शिर्डी या 17 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यभरातील युतीचे पदाधिकारी या मतदारसंघांत तळ ठोकणार आहेत. 

निवडणूक किती टप्प्यात घ्यावी, हा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. राज्यात प्रथमच चार टप्प्यांत निवडणूक होत असल्याने आम्हाला कार्यकर्त्यांची अधिकाधिक ताकद वापरता येणार आहे. 
- माधव भंडारी, प्रवक्‍ते भाजप. 

मागील काही वर्षांत निवडणूक आयोगाबाबत अनेक योगायोग घडताना दिसत आहेत. यंदाही असाच योगायोग घडल्याने काळजी वाटत आहे. महाराष्ट्रात कधीही चार टप्प्यांत निवडणूक झाली नव्हती. तशी गरजही कधी लागली नव्हती. 
- सचिन सावंत, प्रवक्‍ते कॉंग्रेस. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com