Loksabha 2019 : लोकसभेला चांगले काम करणाऱ्यालाच विधानसभेची उमेदवारी

Loksabha 2019 : लोकसभेला चांगले काम करणाऱ्यालाच विधानसभेची उमेदवारी

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यावर तेथील उमेदवार निश्‍चित करण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेच्या इच्छुकांच्या ‘कर्तृत्त्वा’वर तेथील उमेदवार ठरणार आहेत.

लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेची निवडणूक आहे. पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात विधासनभेचे २१ मतदारसंघ आहेत. तेथील विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकही आता तयारीला लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत त्या-त्या मतदारसंघातील मताधिक्‍याची दखल घेऊन उमेदवार निश्‍चित करू, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या बैठकीत याबाबत सूतोवाच केले आहे. ‘‘विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य चांगले मिळाले तर, पक्ष त्याची दखल घेईल आणि मताधिक्‍य मिळाले नाही तर, त्याचीही दखल पक्ष घेईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा मतदारसंघात सुमारे ५ ते ६ लाख मतदार आहेत. लोकसभेच्या प्रचाराबरोबरच विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचाराचा आढावा समन्वयकांकडून घेतला जात आहे. तसेच बूथ प्रमुख नियुक्त करण्याच्या प्रक्रियेतही आमदारांना सहभागी करून घेतले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत या बाबत स्पष्ट भूमिका घेतली. ‘‘विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी हवी असेल तर, तुमच्या प्रभागात, विधानसभा मतदारसंघात किती मताधिक्‍य मिळाले, याची दखल पक्ष घेईल आणि मग उमेदवार ठरविले जातील,’’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे समन्वयक हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या उमेदवाराच्या मताधिक्‍यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाचे लक्ष असेल, असे म्हटले आहे. केवळ विधानसभा नव्हे तर, पक्ष संघटनेतील पदासाठीही निवडणुकीच्या आखाड्यात कोणी किती प्रयत्न केले आणि त्याचे फलित काय, 

याचा आढावा घेतला जाणार असल्याचे 
पाटील यांनी काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीत सांगितले आहे.   
या बाबत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘मताधिक्‍य मिळणे, हा सामूहिक प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यात प्रत्येकाचा सहभाग किती आहे, याचे मूल्यमापन पक्ष करणार आहेच. बूथ प्रमुख, प्रभागनिहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय त्याचा लेखाजोगा घेऊन पक्ष निर्णय घेईल. त्यानुसार पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील.’’ 

लोकसभा 2019

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com