तळागाळातून उभे राहिलेले खासदार बाळासाहेब माने

तळागाळातून उभे राहिलेले खासदार बाळासाहेब माने

एखाद्या माणसाला आमदार, खासदारपद मिळाले की, तो पुन्हा पुन्हा त्यावर हक्क सांगू लागतो; पण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात खासदार दत्ताजीराव कदम अशी व्यक्ती होती, की त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन काँग्रेस नेत्यांच्या वादात दोघांनाही दुखवायचे नाही म्हणून पुढच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीची माळ बाळासाहेब माने यांच्या गळ्यात पडली.

बाळासाहेब माने म्हणजे तळागाळातून उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व. ते रुकडीचे सरपंच होते. हातकणंगले पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष या पदावर ते केवळ कार्यरत नव्हते; तर आपला वेगळा ठसा उमटवून गेले. ते दत्ताजीराव कदम यांना मानत होते. या सर्व परिस्थितीचा फायदा बाळासाहेब माने यांना उमेदवारी मिळण्यात झाला. या लोकसभा मतदारसंघात इचलकरंजी, शिरोळ, वडगाव, पन्हाळा-बावडा, गगनबावडा हा परिसर होता. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने माने यांचे जिल्ह्यात संबंध होते. त्यामुळे माने यांच्या उमेदवारीबद्दल पक्ष निश्‍चिंत होता. मात्र, रत्नाप्पा कुंभार काय करणार, हा संशय होताच. 

माने यांच्या विरोधात जनता दलाचे काका देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. काका देसाई हे स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्त्वाचे स्वतंत्र पानच होते. जेथे काही आक्रमण करायचे, ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडायचे तेथे काका देसाई पुढे असायचे. कोल्हापुरात विल्सन पुतळा फोडण्यातही ते पुढे होते. त्यामुळे बाळासाहेब माने हे स्वातंत्र्यानंतरचे तर काका देसाई स्वातंत्र्य लढ्यापासूनचे कार्यकर्ते, अशी लढत उभी राहिली.

या निवडणुकीत इचलकरंजी वगळता शिरोळ, वडगाव, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब माने यांना पाच-सहा हजारांची आघाडी मिळत गेली. राधानगरीत मात्र १३ हजारांची आघाडी मिळाली आणि बाळासाहेब माने यांनी ३३ हजार ४६४ इतके मताधिक्‍य घेत इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नोंद केली.  

श्री. माने यांच्या खासदारकीने शिरोळ, हातकणंगले या तालुक्‍यातील राजकारणाचे चित्रच पालटले. माने यांनी त्यांच्या खणखणीत वृत्तीने रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. कल्लाप्पा आवाडे यांनाही त्यांनी आपले राजकीय शत्रूच मानले आणि खासदार माने यांनी जिल्ह्याच्या राजकारणातच आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. ते बेधडक बोलत होते. पक्षाच्या ठराविक नेत्याबद्दल जाहीरपणे बोलत होते.

शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यात आपला स्वतंत्र गट ते उभारत होते. रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील, तात्यासाहेब कोरे यांना तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केला. त्यामुळे हे तिघे त्यांच्या लोकसभेतील पराभवासाठी उघड भूमिका घेत राहिले; पण बाळासाहेब माने १९८० नंतर सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com