धर्माच्या नावावर देशाचे तुकडे अमान्य! आज विद्यार्थ्यांचा एल्गार 

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वधर्मीय नागरिकांनी कुर्ला येथे शांततेत आंदोलन केले.
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वधर्मीय नागरिकांनी कुर्ला येथे शांततेत आंदोलन केले.

मुंबई : धर्माच्या नावावर देशाचे तुकडे अमान्य असल्याचे म्हणत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी विरोधात मुंबईत आज, गुरुवारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलन पुकरले आहे. महात्मा गांधी यांच्या "चले जाव' चळवळीची मुंबईतील सुरवात ज्या मैदानावरून झाली त्या ताडदेव येथील ऑगस्ट क्रांती मैदानात हे आंदोलन संध्याकाळी 3 वाजता होणार आहे. या आंदोलनाला सिने अभिनेता, निर्माता फरहान अख्तरनेही पाठिंबा दिला असून आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे म्हणत या आंदोलनाला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

या आंदोलनाला राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. नुकतेच मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस), मुंबई विद्यापीठ, आयआयटी पवई आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी नागरिकत्व विधेयकाला आणि नागरिकत्व राष्ट्रीय नोदणींला विरोध केला. आता संपूर्ण राज्यातील विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन छेडणार आहेत. राज्यभरातील विद्यार्थी आणि संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सीवायएसएसचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी नेते ऍड. अभिषेक भट्ट यांनी सांगितले.

छात्र भारतीचे सचिन बनसोडे, रोहित ढाले, एसएएसयूचे सिद्धार्थ इंगळे, एसएफआयच्या कविता वारे, एएसएचे बुद्धभूषण कांबळे, एआयएसएफचे अमिर काझी, पीएसयूचे साम्या कोरडे, टीसच्या अनुवृत्ती सक्‍सेना, एमएएमएलएचे सुनील डावरे आदी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या आंदोलनात मुंबई आयआयटीचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. तसे संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आले असल्याचे आयआयटीचे प्राध्यापक अनुपम गुहा यांनी म्हटले आहे. 

अत्याचाराचा निषेध 
आम्हाला हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी मान्य नसून दिल्ली पोलिस विद्यार्थ्यांवर अत्याचार करीत आहेत. त्याचा आम्ही निषेध करणार असून आम्ही धर्माच्या नावाने देशाचे तुकडे होवू देणार नाही. आपल्या सर्वांसाठी भारतीय राज्यघटनेचे रक्षण केले पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरुध्द हे आंदोलन असेल, अशी माहितीही ऍड. भट यांनी दिली. 

कुर्ला येथे मूक मोर्चा 
कुर्ला येथे नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वधर्मीय नागरिकांनी मूक मोर्चा काढला. बुधवारी सकाळी 11 वाजता एलबीएस रोड दर्गा ते चिरागनगरपर्यंत या कायद्याला विरोध दर्शवणारा शांतीपूर्ण मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्यने नागरिक सहभागी झाले होते. आम्ही सर्व एक आहोत, संविधान वाचवा या घोषणा देणारे फलक घेऊन नागरिक मोर्चात उतरले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com