राज्य सरकारची धक्कादायक कबुली; वाढते प्रमाण चिंताजनक
नागपूर - विविध उपाययोजनांनंतरही एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या अकरा महिन्यांत राज्यात तब्बल 13 हजार 541 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने आज विधिमंडळात दिली.
राज्यातील बालमृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असल्याची बाब लपून राहिलेली नाही. विशेषत: हे मृत्यू आदिवासीबहुल जिल्ह्यातील आहेत. विरोधी पक्षांच्या डझनभर आमदारांनी या संदर्भात सरकारला आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून जाब विचारला. यावर लेखी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अकरा महिन्यांत 13 हजार 541 बालमृत्यू झाल्याची कबुली दिली. सरकारने विविध उपाययोजना राबवल्यानंतरही हे मृत्यू झाल्याचे सावंत म्हणाले.
बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची सारवासारव सावंत यांनी केली. गरोदरपणातील तपासणी व उपचार, लसीकरण, नवजात काळजी कक्ष, जंतनाशक मोहीम, पोषण, भरारी पथके, टास्क फोर्स, केंद्र व राज्याच्या उपाययोजना याची जंत्री सावंत यांनी लेखी उत्तरात दिली. परंतु, या उपाययोजना कागदावरच राहिल्याचे आज दिसून आले.
बालमृत्यूची टक्केवारी
22 : कमी वजनाचे अर्भक
17 : श्वसनाचे आजार
07 : न्यूमोनिया व जंतूसंसर्ग
0.32 : अतिसार
65 : 28 दिवसांपर्यंतचे अर्भक
21 : 1 वर्ष वयापर्यंतचे अर्भक
14 : 1 ते 5 वर्षे वयोगट
|