
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीवरून टीका करताना म्हटलं की, वृत्तपत्रात लेख, जाहिराती देऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यातील ठाकरे सरकार '३ प' पुरते मर्यादित; भाजपची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. यावर विरोधी पक्ष भाजपने पत्रकार परिषद घेत दोन वर्षाचं हे सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवतीच फिरणारं असल्याचं म्हटलं. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या आणि आज सरकारचं लक्ष आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो असंही भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले.
भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीवरून टीका करताना म्हटलं की, वृत्तपत्रात लेख, जाहिराती देऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. सध्या मुख्यमंत्री रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत व्यवस्थित होवो असंही आशिष शेलार म्हणाले. तसंच महाराष्ट्र सरकारच्या विकासाशी आमचे वैर नाही. टीकेला टीका करायची म्हणून आमची पत्रकार परिषद नसल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
आघाडी सरकारच्या दोन वर्षाचं वर्णन कमी शब्दात करायचं झालं तर एवढेच करता येऊ शकतं ते म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या. पुत्र पुत्री आणि पुतण्या या भोवती फिरणारी दोन वर्षाचं सरकार म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे. दोन वर्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर सातशे साडेसातशे च्यावर दिवस जनतेचं काम व्हावं एवढंच अपेक्षित होते. पण दोन वर्षांमध्ये साडेसातशे याच्यावर दिवस गेले ते राज्यातील जनतेच्या कामाच्या भोवती केंद्रित न होता ते केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्याने त्यांच्या पुत्र पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरत आहे.
काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच याचं नाटक आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. अडचण काहीच नाही एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटतं. त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही पण राज्यात निर्णय काय घेतले हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचं दिसतं असंही शेलार यांनी म्हटलं.
शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीचं सरकार हे फक्त प पार्टी, प पब आणि प पेंग्विन इतकंच सरकार राहिले आहे. सरकारी कार्यालये वाढवली जात नाहीत. पण हॉटेलची वेळ वाढवली गेली. पेट्रोल दर कमी झाली नाही पण विदेशी दारू कमी किंमत झाली असे म्हणत शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, या सरकार मध्ये सामान्य माणसाचे भले झाले नाही. अहंकार,अतर्क,असंवेदनशील कार्यपद्धती सरकारची दोन वर्षे राहिली. सुपुत्री प्रेमामुळे राज्यावर ही वेळ आली. तर पुतण्या प्रेमामुळे एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती आली असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरही आशिष शेलार बोलले. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत. पण दुसरीकडे परदेशी दारूची किंमत कमी केली. पेट्रोलच्या दरात मात्र काहीच बदल नाही. शाळांचे अनुदान दिले जात नाही पण रयत शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपये दिले जातात. बाजार समिती मधील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढला जातो असंही ते म्हणाले.