मुंबई : आरएनए ग्रुपच्या सुमारे 400 कर्मचारी-कामगारांना गेली जवळपास दोन वर्षं पगार मिळालेला नाही. आपल्या हक्काचे पैसे व देणी कंपनीकडून मिळवण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर आरएनए ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच पत्र लिहून या प्रकरणात "न्याय मिळवून द्या तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवकणूक व दमदाटी करणाऱ्या आरएनए मालकाला धडा शिकवावा", अशी विनंती केली आहे.
आरएनए ग्रुप ही मुंबईतील एक मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. या कंपनीच्या कर्मचा-यांना फेब्रुवारी 2018 पासून पगार मिळालेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचा-यांना कंपनीच्या मालकाने दमदाटी करून नोकरी सोडण्यास भाग पाडले, तर आर्थिक मंदी असल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळणं शक्य नसल्यामुळे अनेकजण पगार मिळत नसतानाही काम करत राहिले. पीएफ, ग्रॅच्युइटी आणि फाॅर्म 16 ची थकबाकीसुद्धा कर्मचा-यांना मिळालेली नाही. ह्यासंदर्भात आरएनए कंपनीचे संचालक अनुभव अग्रवाल आणि गोकुळ अग्रवाल ह्यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही ते कर्मचा-यांना कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कर्मचा-यांनी कामगार न्यायालय तसंच नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनल (NCLT) येथेही पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून कंपनीच्या सुमारे 200 कर्मचा-यांनी लेखी पत्राद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनाच साकडं घातलं आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकबाकीची रक्कम 20 कोटी इतकी आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले, "मे 2014 मध्ये आरएनए ग्रुपचे संस्थापक अनिल अग्रवाल ह्यांचं निधन झाल्यानंतर कर्मचा-यांचा पगार देण्यात अनियमितता येऊ लागली. 2016 मध्ये तर कर्मचा-यांना तब्बल सहा महिने पगारच मिळाला नव्हता. फेब्रुवारी 2018 नंतर तर कर्मचा-यांना अजिबात पगार मिळालेला नाही. त्यामुळे ह्या कर्मचा-यांना घरचा खर्च चालवणंही कठीण झालं आहे. अखेर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांना पत्र लिहिले आहे."
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि चिटणीस केतन नाईक ह्यांच्याकडे आरएनए ग्रुपचे कर्मचारी आपली समस्या घेऊन आल्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती करणारे पत्र लिहिले आहे.
"महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी 24 डिसेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांना आरएनए संदर्भात पत्र पाठवले होते. त्यानंतर कर्मचा-यांच्या मागण्यांविषयीची चर्चा करण्यासाठी आम्ही आरएनए व्यवस्थापनाला सहा जानेवारीला लेखी पत्र पाठवले. पण त्याला कोणतंही उत्तर व्यवस्थापनाकडून आले नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आरएनए कार्यालयाबाहेर शांततापूर्ण निषेध आंदोलन करणार आहोत. त्यालाही जर व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर मात्र आम्हाला कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन करावेच लागेल", असे 'मनकासे'चे चिटणीस केतन नाईक ह्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.