नागपूर - मुंबई व कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 24 तास आपत्ती व्यवस्थापन सेलमधील मनुष्यबळ कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मुंबई व कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीवितहानी होणार नाही, यासंदर्भातील खबरदारी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून काम सुरू आहे. पावसात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले आहे. तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळवली आहे. वसई-विरारदरम्यान रेल्वे वाहतूक बंद आहे. मात्र, लोकलसेवा सुरू आहे. रस्ते वाहतूक मंदगतीने सुरू आहे. प्रशासनाला सजग राहण्याचा इशारा दिला आहे, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, आशिष शेलार यांनी मुंबई-कोकणातील प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ
अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. ज्या भागात अतिवृष्टीमुळे विद्यार्थी अकरावी व बारावीच्या प्रवेशापासून वंचित राहिले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रियेत मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
|