नाशिक : समन्यायी वाटपाच्या कायद्यानुसार जायकवाडीसाठी गुरुवारी सकाळी दहापासून गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याची तूट निदर्शनास आणून दिल्याने नाशिकला पाण्याची चणचण भासू नये म्हणून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाने दिले. मात्र, दारणा आणि मुकणे धरणातील जायकवाडीसाठीचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आज सकाळी दहापासून जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, मुकणे धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली. सायंकाळपर्यंत 350 दशलक्ष घनफूट पाणी रवाना झाले.
नाशिक जिल्ह्यातून 2 हजार 640 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. सकाळी गंगापूरमधून एक हजार, दारणामधून तीन हजार आणि मुकणे धरणातून एक हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरवात झाली. विरोधाच्या पार्श्वभूमीवर धरणातून पाणी सोडत असताना पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोचली आहे. गोदावरी खळखळून वाहू लागल्याने स्थानिक काठावर उभी केलेली चारचाकी वाहने पाण्यात अडकली आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार धरणातील विसर्ग आणखी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.
मुख्य अभियंत्यांचा आदेश
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बिगर सिंचन आरक्षणात केलेली वाढ व सिंचनासाठी येणारी पाण्याची तूट या सर्व बाबी गंगापूरमधून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या स्थगिती आदेशात नमूद केले आहे. तसेच, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयातून अंतिम निर्णय मिळाल्यावर गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा सुधारित आदेश देण्यात येईल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.