लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या नावांपैकी एकावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे. बैठकीत कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली, कोणाला किती मते मिळाली, हेही जाहीर केले जाणार आहे. या पर्यायामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया अटळ आहे, हे स्पष्ट होत आहे.
संमेलनाध्यक्ष सन्मानाने निवडला जावा, अशी मागणी साहित्य क्षेत्रातून अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे साहित्य महामंडळाने दीड वर्षांपूर्वी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद केली. शिवाय डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवडही केली; पण साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रत्येक वेळेस एकमत होईलच असे नाही. त्यामुळे महामंडळाने अंतर्गत निवडणुकीचा पर्याय खुला ठेवला आहे. पूर्वी जवळपास एक हजार 70 जण मतदान करत होते. आता अंतर्गत निवडणुकीत 19 जण मतदानाचा हक्क बजावू शकतील.
नावांच्या गोपनीयतेसाठी...
संमेलनाध्यक्षपदासाठी घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांकडून वेगवेगळ्या नावांची यादी साहित्य महामंडळातर्फे मागवली जाते.
महामंडळाच्या बैठकीआधीच यादीतील नावांची चर्चा होत राहते. ती टाळण्यासाठी आणि बैठकीपर्यंत नावे गोपनीय राहण्यासाठी महामंडळाने यंदा बैठकीच्या दिवशीच घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांनी आपली नावे महामंडळाकडे द्यायची, असा बदल केला आहे. नावांवरून होणाऱ्या उलटसुलट चर्चेला विराम मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीत कोणकोणती नावे येणार, याबाबत आता उत्सुकता राहिल.
दोन्ही घोषणा उस्मानाबादमध्येच
आगामी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. तेथे येत्या 22 सप्टेंबरला साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. तित संमेलनाच्या तारखा, संमेलनातील कार्यक्रमांचा प्राथमिक आराखडा ठरविण्यासह संमेलनाध्यक्षांची निवडही याच बैठकीत होणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्षांचे नाव, संमेलनाच्या तारखा उस्मानाबादमध्येच जाहीर केल्या जाणार आहेत. संमेलन जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
संमेलनाध्यक्षपदासाठी येणारी नावे बैठकीच्या दिवशी स्वीकारणार आहोत. या नावांवर बैठकीत चर्चा होईल. एकमत झाले नाही तर निवडणूक घेऊन संमेलनाध्यक्ष ठरवले जातील. या प्रक्रियेत निवडणूक अटळ आहे, हे समजून घ्यायला हवे.
- कौतिकराव ठाले-पाटील,अध्यक्ष, साहित्य महामंडळ.
|