उजनीचे सगळेच दरवाजे गुरूवारी बंद होणार!उजव्या कालव्याचे पाणी बंद! आष्टी तलावात आजपासून पाणी; धरणात आता ‘इतकेच’ पाणी

उजनी धरण सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आले असून धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून उर्वरित ४० टीएमसी पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवायचे आहे. शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी आज (गुरूवारी) बंद करण्यात आले.
उजनी धरण
उजनी धरणSakal

सोलापूर : उजनी धरण सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आले असून धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून उर्वरित ४० टीएमसी पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवायचे आहे. शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी आज (गुरूवारी) बंद करण्यात आले असून उद्यापासून (शुक्रवार) आष्टी तलावात पाणी सोडले जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती असून माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये देखील दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भूजल सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणीपातळी एक मीटरने खालावली असून यंदा काही तालुक्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. संभाव्य पाणी संकटाचा अंदाज घेऊन मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात पुढील तीन दिवस पाणी सोडले जाणार आहे.

सध्या या तलावात ३० टक्के पाणी आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत उजनीतून सोडलेले डाव्या कालव्याचेही पाणी पूर्णत: बंद केले जाणार आहे. धरण उणे २० टक्के होईपर्यंत कॅनॉलमधून पाणी सोडता येते. त्यानंतर पाणी कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचनमधून अपेक्षित वेगान जात नाही. त्यामुळे सध्याचे आवर्तन शेतीसाठी शेवटचे होते. आता शेतकऱ्यांना पावसाळ्यापर्यंत उजनीतून पाणी मिळणार नाही. सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामती, इंदापूर या शहरांसह एमआयडीसी व सोलापूर जिल्ह्यातील १००हून अधिक गावांचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव असणार आहे.

सोलापूरसाठी पावसाळ्यापर्यंत ३ आवर्तने

सध्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर उजनी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. सोलापूर शहरासाठी एका आवर्तनासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे सहा टीएमसी पाणी सोडावे लागते आणि औज बंधाऱ्यात आलेले दोन टीएमसी पाणी उन्हाळ्यात ५० ते ५५ दिवसांपर्यंतच पुरते. पाऊस पडेपर्यंत उजनीतून सोलापूरसाठी तीन आवर्तने सोडली जाणार आहेत. मार्चमध्ये एक आणि त्यानंतर मे महिन्यात एक आवर्तन सोडले जाईल. पण, पाऊस लांबल्यास जूनअखेर एक आवर्तन सोडावे लागणार असून त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com