अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ठरलं! आता बालक व पालकांसह भव्य मोर्चा; ४९ दिवसानंतरही मागण्यांवर सरकारकडून तोडगा नाही

संप सुरू होऊन ४९ दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. मागण्या मान्य करण्याऐवजी दडपशाही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, अंगणवाडी कर्मचारी गावागावातील बालक व पालकांसोबत मोर्चा काढणार जाणार आहे.
सोलापूर आंदोलन करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस.
सोलापूर आंदोलन करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस.sakal

सोलापूर : संप सुरू होऊन ४९ दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. मागण्या मान्य करण्याऐवजी दडपशाही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, अंगणवाडी कर्मचारी गावागावातील बालक व पालकांसोबत मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड व जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार व कांचन पांढरे यांनी दिली.

मानधन वाढ करावी, ऑनलाइन कामासाठी नवीन मोबाइल द्यावेत, पेन्शन व ग्रॅच्युइटी द्यावी यासह अन्य मागण्या सरकारकडे करीत ३ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूरसह राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. सुरवातीला सर्वच मागण्यांवर कर्मचारी ठाम होते, पण कालांतराने दोन पावले मागे टाकत पेन्शन व ग्रॅच्युइटी जाहीर करावी, मानधन वाढीचे लेखी आश्वासन द्यावे, या मागण्या मान्य केल्यास संप मागे घेण्याची भूमिका संघटनांनी घेतली. तरीदेखील त्यावर निर्णय झालेला नाही.

मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने आपल्यावर दबाव टाकला जात आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चिकाटीने हा लढा सुरू ठेवला आहे. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत माघार नाही अशी संघटनेची ठाम भूमिका आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी बालक व पालकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असल्याचेही श्री. गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

दीड महिना होवून गेला, तरीदेखील सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो, पण त्यासाठीही सरकारला वेळ नाही. दीड महिन्यापासून मानधन नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. अलिशान बंगले, गाड्यांमध्ये फिरणाऱ्या मंत्र्यांना आमचे हाल कधी दिसणार असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे. सरकारला ताकद दाखविण्यासाठी आता प्रत्येक अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस महिलांच्या माध्यमातून बालक, पालकांना मोर्चात सामील करून घेतले जाणार आहे. मोर्चा याच आठवड्यात असून त्याची तारीख निश्चित झाली नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com