अंगणवाडी ताईंना मिळणार ‘गूड न्यूज’! दोन-अडीच हजारांनी वाढणार मानधन

अंगणवाडी ताईंचा दरवर्षीचा भाऊबीज मिळविण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होणार आहे. त्यांच्या मानधनात आता दोन-अडीच हजार रुपयांची मानधन वाढ प्रस्तावीत असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल.
Mantralay
Mantralaysakal media

सोलापूर : चिमुकल्यांना (० ते ६ वयोगट) शाळेची गोडी निर्माण करून त्यांचा बौध्दिक विकास व्हावा म्हणून अंगणवाडी सेविका महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. अंगणवाडी ताईंचा दरवर्षीचा भाऊबीज मिळविण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होणार आहे. त्यांच्या मानधनात आता दोन-अडीच हजार रुपयांची मानधन वाढ प्रस्तावीत असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

महागाई वाढली, काम वाढले पण अंगणवाडी ताईंचे मानधन तेवढेच राहीले. चिखलाचा गोळा समजल्या जाणाऱ्या मुलांकडे स्वत:च्या मुलांपेक्षा अधिक लक्ष देऊन त्यांच्या आयुष्याला अचूक दिशा दाखविणाऱ्या अंगणवाडी ताईंच्या मानधनाचा प्रश्न आता सरकारने दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार हजार २०० अंगणवाड्या असून त्याठिकाणी तीन हजार ८०० सेविका व चार हजार मदतनीस काम करीत आहेत. बहुतेक अंगणवाडी ताईंचा संसार तथा उदरनिर्वाह दरमहा मिळणाऱ्या साडेसात हजारांच्या मानधनावरच चालतोय. शासन सांगेल ते काम अचूकपणे करणाऱ्या अंगणवाडी ताईंना मानधन कमी आणि प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना लाखोंची पगार अशी वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी संघर्ष केल्यानंतर त्यांना दिवाळीत भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. आता ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. पण, त्यांचे मानधन वाढवून अंगणवाडी ताईंना कायमचा दिलासा देण्याचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास अडीचशे जागांवर अंगणवाडी सेविका नाहीत. सोलापूरसह राज्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत.

शाळाबाह्य मुलांचे प्रमाण घटले

कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने शाळा न शिकणाऱ्यांची तथा शाळेत न येणाऱ्या मुलांची संख्या काही वर्षांपूर्वी मोठी होती. पण, गावोगावी गरजेच्या ठिकाणी अंगणवाड्यांची उभारणी झाली. त्याठिकाणी नेमलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षक यांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबातील मुले शाळेत येऊ लागली आहेत. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाण किंवा गळतीचे प्रमाण आता अत्यल्प झाले आहे. त्यात मोठा वाटा अंगणवाडी ताईंचाच आहे. मानधन वाढीतून त्यांचा कामाचा उत्साह वाढविण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com