राज्यभरातून छायाप्रतीसाठी दीड लाख अर्ज
सोलापूर - उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास असतानाही थोड्या गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या एक लाख 74 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठांकडे छायाप्रतीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करायचा की मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करायचे, असा प्रश्न उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांनी विद्यापीठाला केला आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार असून, त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छायाप्रतीसाठी दोनशे, तर पुनर्मूल्यांकनासाठी पाचशे रुपये शुल्क भरून यंदा राज्यात तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले असून, विद्यापीठांना सात कोटी 90 लाख 35 हजार रुपये मिळाले आहे. मात्र, प्राध्यापकांची अपुरी संख्या अन् तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अध्यापनाचा कमी अनुभव यामुळे जुलैअखेर पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेसाठी दीड महिन्याचा विलंब लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश लांबणीवर पडणार असून, त्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. दरम्यान, वेळापत्रकानुसार तास व्हावेत, वर्षाचा अभ्यासक्रम नियोजनाप्रमाणे पूर्ण करावा, असे निर्देश विद्यापीठाने प्राध्यापकांना दिल्याने आता प्राध्यापकही नियमावर बोट ठेवू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे या वर्षी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी छायाप्रत व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. महाविद्यालये सुरू झाल्याने पुनर्मूल्यांकनासाठी विलंब होत आहे. ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- डॉ. श्रीकांत कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
|