बहुजनांसाठी क्रांतिसिंहांनी केला स्वतःच्या नोकरीचा त्याग

Krantisinha Nana Ramchandra Patil
Krantisinha Nana Ramchandra Patilesakal
Summary

ब्रिटिशांनी नानांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं, जंगजंग पछाडलं; पण नाना ब्रिटिशांना सापडले नाहीत.

संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो व इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावांत 'प्रतिसरकार' चालविणारे क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील (Krantisinha Nana Ramchandra Patil) यांची आज पुण्यतिथी! नानांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘बहे-बोरगाव’ येथे झाला. सांगली (Sangli) जिल्ह्यातील ‘येडमच्छिंद्र’ हे त्यांचं मुळगाव होतं; पण वडील रामचंद्र हे गावचे पाटील म्हणून कार्यरत होते, म्हणून लहानपणी नाना पाटील यांचं वास्तव्य मुख्यत्वे वाळवा या गावीच होतं. सातारा (Satara), सांगली या महाराष्ट्राच्या भागात स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत इंग्रज शासनाला आव्हान देत प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील होते.

नानांनी स्वतःला चळवळीत झोकून दिलं

बालपण गावाकडं गेल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर नाना 'तलाठी' म्हणून कार्यरत झाले. मात्र, स्वातंत्र्याची उमेग हाती धरलेल्या नानांनी नोकरी सोडून दिली आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्य लढ्याच्या जोडीनं बहुजन समाजाच्या विकासाकडं त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं होतं. 1930 ला झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. यासाठी त्यांनी स्वतःच्या नोकरीचाही (Job) त्याग केला. ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यातून त्यांना लढण्याचं बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिलं. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या नानांची भाषणे लोकांना प्रभावित करीत होती आणि त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली.

Krantisinha Nana Ramchandra Patil
Krantisinha Nana Ramchandra Patil

नानांनी ‘आपुला आपण करू कारभार’ हे सुत्र आमलात आणलं

ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणं हे क्रांतिसिंहांचं स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख कार्य होतं. 1942 च्या चळवळीत नानांनी ‘आपुला आपण करू कारभार’ हे सुत्र आमलात आणलं. त्यातूनच नानांनी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी 1942 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. नानांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातील तुफान दलात फील्ड मार्शल जी. डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगावी काम करत होत्या. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाॅम्बगोळे फेकण्याचं प्रशिक्षणही या जवानांना होतं.

Krantisinha Nana Ramchandra Patil
Krantisinha Nana Ramchandra Patil

'तुफान सेना’ सैन्य दलाची स्थापना

प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडण-तंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना-पाटलांना कडक शिक्षा, अशी अनेक समाजोपयोगी कामं करण्यात येत होती. या सरकारअंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावानं सैन्य दलाची स्थापना केली. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचं तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवलं. 1943 ते 1946 या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे 1500 गावांत प्रतिसरकार कार्यरत होतं.

Krantisinha Nana Ramchandra Patil
Krantisinha Nana Ramchandra Patil

क्रांतिसिंहांवर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांचा प्रभाव

1920 ते 1942 या काळात नाना 8-10 वेळा तुरुंगात गेले. 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं, जंगजंग पछाडलं; पण नाना ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. नानांवर महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या सत्यशोधक विचारांचा व राजर्षी शाहूंच्या (Rajshree Shahu Maharaj) कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी-विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचं कार्य केलंय.

'मला वाळव्यातच दहन करण्यात यावं'

त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी (Nagnathanna Nayakwadi) यांसारखे कार्यकर्ते घडले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्यानं प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचं 6 डिसेंबर इ.स. 1976 वाळवामध्ये निधन झालं. मला वाळव्यामध्येच दहन करण्यात यावं ही त्यांची इच्छा होती, त्यानुसार वाळव्यातच दहन करण्यात आलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नानांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केलं. 1957 मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 1967 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

टीप : या लेखासाठी Wikipedia सह अन्य काही वेबसाइटवरुन संदर्भ घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com