अमरावतीमध्ये पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला; 28 जखमी

अमरावतीमध्ये पोलिसांसह वन कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला; 28 जखमी

चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला. यामध्ये पोलिस व वन विभागाचे 28 कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. आंदोलकांनी जंगलामध्ये जाऊन जाळपोळ सुरू केली व जंगलातील कुरणाला आग लावून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून आंदोलकांना समजाविण्यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. महसूल, पोलिस, वनविभाग व पुनर्वसन खात्याचे अधिकारी आदिवासींची मनधरणी करीत होते. रविवारी (ता. 20) अमरावती व अकोल्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपवनसंरक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजविण्यासाठी गेले होते. या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी बसेसचीसुद्धा व्यवस्था वनविभागाकडून करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवून त्यातून तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

अधिकारी तसेच आंदोलनकर्त्यांमध्ये शांततेत चर्चा सुरू असतानाच काही आंदोलक हिंसक झाले व त्यांनी पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. काही वेळातच त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत तिखट टाकून त्यांच्यावर कुऱ्हाड व विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात 28 वनकर्मचारी आणि पोलिस जखमी झाले. यापैकी चार कर्मचाऱ्यांची स्थिती गंभीर आहे. जखमीत काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी सुरवातीला अकोट व त्यानंतर अकोला येथे दाखल करण्यात आले. सदर हल्ल्यात गावकऱ्यांनी शासनाच्या 15 गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. 

यासंदर्भात वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अमरावती क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलिस ताफा वाढविण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात जमाव बंदीकरिता कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

जखमी कर्मचाऱ्यांची नावे

जखमींमध्ये संजय इंगोले, श्‍याम देशमुख, एस.बी. घुगे, नितीन राऊत, रविंद्र बुगाडे, हेमंत सरकटे, राजू वाघमारे, रामेश्वर आढे, शंकर डाखोरे, श्रीकृष्ण पारसकर, रोशन कुडवे, अविनाश जायभाये, कैलास वाकोडे, सरस्वती टीकार, रामलीला सावल, संतोष चव्हाण, सुनील वाकोडे, हरी नागरगोचे, रघुनाथ नेवर, सुरेश माने, एस.डी. जामकर, ए.एस. अंभोरे, समाधान गुगळ, आकाश शिंदे, हरिश देशमुख, विनोद गिरुडकर यांचा समावेश आहे. त्यापैकी चार गंभीर असून, त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

14 जानेवारीपासून आंदोलन 

वनक्षेत्रातील आठ गावांतील नागरिकांनी 12 जानेवारीला वनविभागाला निवेदन सादर करून माणसी पाच एकर शेती द्या किंवा आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या. या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या पुढे रेटल्या होत्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांनी अकोट वन्यजीव विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात सोमवारी (ता.14) अवैधपणे प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी खटकाळी येथील प्रवेशद्वाराची तोडमोड केली होती. वनरक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात तीन वनरक्षक किरकोळ जखमी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com