औरंगाबाद - 'समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून ऐक्य झाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य शक्य नसल्याने मी दुय्यम स्थान स्वीकारण्यास तयार आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऐक्याचा राजा व्हावे, मी सरदार आहेच,'' असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ""दलित समाज, कार्यकर्ते, नेत्यांमध्ये ऐक्य होणे गरजेचे आहे. कोणासोबत जायचे हे मताधिक्याने ठरवायला हवे. मात्र, माझे मंत्रिपद घालविण्यासाठी ऐक्याचा नारा दिला जात असल्यास तो मान्य होणार नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव भीमा येथील घटनेतील दोषी, तसेच दलित-मराठा समाजात फूट पडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दलित कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन कोंबिंग ऑपरेशन थांबविण्याची विनंतीही केली आहे. या घटनेमागे मराठा, हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
ते म्हणाले, 'प्रकाश आंबेडकरांना आपला विरोध नाही. बंद होणारच होता. समाज अगोदरच रस्त्यावर उतरला होता. त्यात माझा पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे मोठे होण्याचा, बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच नाही. योग्यवेळी फ्रंटफूटवर कसे यायचे ते मला माहीत आहे. अठरा वर्षे संघर्ष केल्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. या लढ्यात अनेकांनी सहभाग दिला. काही जण हुतात्मा झाले. अशा सर्वांना आंदरांजली वाहत युवकांनी दिलेला एक मंचचा प्रयोग स्तुत्य असला, तरी ऐक्याचा फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत याला अर्थ नाही.''
|