कामगिरीची दखल इतिहास घेईल 

Balasaheb-Thorat
Balasaheb-Thorat

महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय वर्षभरात घेतले. कोरोनाच्या काळातही सर्वांपर्यंत मदत पोचविण्याचे काम सरकारने केले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग अडचणीत असताना महाराष्ट्रातील नव्या सरकारने मात्र जनतेला सर्वतोपरीने मदत केली. महसुलात घट, केंद्राची मदत नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसाठी अन्नधान्य अशी सर्व प्रकारची मदत करण्यात आली. दहा हजार कोटींचे पॅकेज दिले गेले. महाविकास आघाडी यासंदर्भात अत्यंत सजग असून आम्ही केलेल्या कामाची दखल इतिहास घेईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याचा महसूल वाढावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संकटातून आम्ही मार्ग काढू. विरोधकांवर जनतेने सोपविलेली जबाबदारी ते पार पाडत आहेत. टीका करणे त्यांचे काम आहे पण काँग्रेसने सहकारी पक्षांच्या साहाय्याने महाविकास आघाडी सरकारला लोकाभिमुख केले. 

बदनामीचा प्रयत्न
खोट्या तक्रारी , चुकीची माहिती हाताशी घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे चूक तर आहेच पण, अन्यायकारकही आहे. महाराष्ट्रातील जनता धर्मनिरपेक्षतेचा आदर करणारी आहे. केंद्र सरकारने त्यांच्या अधिकारांचा अप्रत्यक्ष वापर करून ज्या गोष्टी सुरु ठेवल्या आहेत त्या लोकशाहीविरोधी आहेत.

स्थलांतरितांना न्याय
महाराष्ट्रातील सरकारने गरिबांना वंचितांना कोरोनाकाळात न्याय दिला. स्थलांतरित मजुरांचेच उदाहरण घेवू. त्यांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेची तिकीटे काढून देणे, डबा देणे, पाणी पुरवणे या सर्व व्यवस्था आम्ही केल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारने सातबाराचा उतारा आधुनिक स्वरूपात तयार करणे, तो मिळवण्याची  प्रक्रिया साधीसोपी, सुटसुटीत करणे ही कामेही या एक वर्षाच्या काळात केली आहेत. काँग्रेसचे सर्व मंत्री अनुभवी आहेत. भावना भडकविण्याचे राजकारण करण्याऐवजी आम्ही सकारात्मकता दाखवतो. सरकार समोरचे पेच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून सोडवतो.

शेतकऱ्यांना दिलासा
आर्थिक अडचणीतून जात असताना सरकारने शेतकरी वर्गाला पॅकेज दिले. फडणवीस सरकारने शेतकरीवर्गाला दिलासा देण्याची भाषा करीत त्यांना केवळ अर्ज भरायला लावले. प्रत्यक्षात त्या सरकारच्या काळात बळीराजाच्या हाती काही आले नाही. आज राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देणारी पावले आम्ही उचलली आहेत याचे समाधान आहे.

ईडीचा गैरवापर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारवर आक्रमक टीका केली आहे. विरोधकांच्या विरोधात सरकारी यंत्रणांचा वापर करण्याचे नवे तंत्र भाजपने आत्मसात केले आहे. पूर्वी ‘ईडी’ हा शब्दही आम्ही ऐकला नव्हता, आता विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने जो वापर होतो त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे नाराज झाले असावेत. सरकारी यंत्रणेचा असा गैरवापर अपेक्षित नाही. 

कोविड काळात सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जी बांधणी केली ती महत्त्वाची होती. महाविकास आघाडीने ‘टास्क फोर्स’ स्थापन करणे, औषधखरेदी करीत ती रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे जे काम केले ते ऐतिहासिक आहे. कोराना काळात सरकार एकदिलाने लढत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com