मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने आज विरोधी पक्षांनी पुकारलेल्या "भारत बंद'च्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला चांगलाच दिलासा मिळाला असून, या दोन्ही पक्षांतील दरी कमी होण्यासाठी विरोधकांच्या "बंद'मुळे मदत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
योग्य वेळ आल्यावर सत्तेतून बाहेर पडू, असे जाहीर करत सत्तेत राहून विरोधकांची भूमिका निभावण्याचे काम शिवसेनेने केले आहे. यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षांची राजकीय स्पेस व्यापून टाकली आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपवरून कडाडून हल्ला केला आहे. मात्र, आज शिवसेना हा पक्ष सत्ताधारी भाजपसोबत खंबीरपणे राहत "बंद'मध्ये सहभागी झाला नाही. त्यामुळे भाजपला हायसे वाटले आहे.
कॉंग्रेसने पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात देशव्यापी "बंद' पुकारला होता. त्याला राज्यात तसेच देशपातळीवर 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा देत या "बंद'मध्ये सहभागी होऊन सरकारचा निषेध केला. मात्र, शिवसेना "बंद'मध्ये सहभागी झाली नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बदलेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेण्याचे धोरण भाजपने अनुसरले आहे. शिवसनेने "बंद'मध्ये सहभागी होऊ नये, यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना "बंद'मध्ये सामील झाली नाही.
|