भवानीनगर - राज्यात आजअखेर 176 साखर कारखान्यांनी 261.5 लाख टन उसाचे गाळप करून सरासरी 9.82 साखर उताऱ्यानुसार 25.72 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दोन महिन्यांनंतरही राज्यात दहा टक्क्यांचा उतारा गाठलेला नाही.
राज्यात सध्या 176 साखर कारखाने दैनंदिन 6.64 लाख टन क्षमतेने उसाचे गाळप करीत आहेत. मागील हंगामात हाच आकडा 5.50 लाख टनांपर्यंत होता. यावर्षी त्यात वाढ झाली आहे. गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर राज्यात पुणे विभागाचा ऊस गाळप व साखर उत्पादनात पहिला क्रमांक आहे. पुणे विभागातील 60 साखर कारखाने सरासरी 2.44 लाख टन दैनंदिन क्षमतेने गाळप करीत असून आतापर्यंत या विभागात 105.96 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 10.35 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हे उत्पादन राज्यात सर्वाधिक आहे.
त्याखालोखाल कोल्हापूर विभागाचा क्रमांक असून, या विभागातील 37 साखर कारखान्यांनी 61.69 लाख टन उसाचे गाळप करून 6.77 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा राज्यात सर्वाधिक 10.99 टक्के साखर उतारा आहे. राज्यात सर्वांत नीचांकी साखर उतारा औरंगाबाद विभागाचा (8.03) व नागपूर विभागाचा (8.26) आहे.
पुणे जिल्ह्यात 31 लाख टन उसाचे गाळप
पुणे जिल्ह्यात 17 साखर कारखाने सुरू असून, कारखान्यांनी 30.98 लाख टन उसाचे गाळप केले आहे. 3.12 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.61 आहे. जिल्ह्यात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक 2.78 लाख टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.
|