
हेरवाड गावानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत माणगाव ग्रामपंचायतीनंही आपल्या गावात विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतलाय.
Gram Panchayat : हेरवाडनंतर 'या' ग्रामपंचायतीनं उचललं मोठं पाऊल
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील (Shirol Taluka) हेरवाड ग्रामपंचायतीनं (Herwad Gram Panchayat) विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली. यानंतर आता हेरवाड पाठोपाठ कोल्हापुरातील (Kolhapur) माणगाव (ता. हातकणंगले) या गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नुकतंच ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला. याबरोबरच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला सासरी जाताना भेट म्हणून पैठणी साडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळं परिसरात या गावाचं कौतुक होतं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव हे असं ठिकाण आहे, जिथं सुमारे १०० वर्षांपूर्वी १९२० साली राजर्षी शाहू महाराजांनी (Rajarshi Shahu Maharaj) शोषित लोकांची अस्पृश्यता परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना (Babasaheb Ambedkar) भावी नेते म्हणून घोषित केलं होतं. 'माणगाव परिषद' म्हणून त्या परिषदेला आजही ओळखलं जातं. आज खऱ्या अर्थानं याच गावातून समतेचा संदेश सर्वत्र गेला आणि त्याची सुरुवात झाली. या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत सरपंच राजू मगदूम (Sarpanch Raju Magdum), उपसरपंच तसेच इतर सदस्य नेहमीच निर्णयांना पाठिंबा देताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळं या गावानं जिल्ह्यात एक वेगळं स्थान निर्माण केलंय.
हेही वाचा: Soldiers Skeletons : पंजाबात सापडले तब्बल 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे
माणगाव ग्रामपंचायतीनं (Mangaon Gram Panchayat) नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गावात जनजागृती करण्याचा व विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. समाजामध्ये विधवा महिलांना योग्य सन्मान न दिल्यानं त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरपंच राजू मगदूम यांनी सांगितलं. दरम्यान, पतीच्या निधनानंतर समाजामध्ये विधवा महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढले जाते. शिवाय विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतलं जात नाही. यामुळं गावासह देशात विधवा महिलांना सन्मानानं जगता यावे याकरिता ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या संध्याराणी जाधव यांनी हा ठराव मांडला. याप्रसंगी उपसरपंच अख्तर भालदार, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा: भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करताच लोक भडकले
हेरवाड गावानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत माणगाव ग्रामपंचायतीनं आपल्या गावातही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. तसंच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला गावाकडून माहेरची साडी म्हणून पैठणी भेट देण्याची एक चांगली प्रथा सुरु केलीय. खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातून पुन्हा एका परिवर्तनाला सुरुवात झालीय.
Web Title: Big Decision Of Mangaon Gram Panchayat Regarding Ban On Widow Practice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..