मोठी बातमी! १० पटसंख्येच्या शाळांचे समायोजन; शिक्षक भरतीला १७ ऑगस्टपासून सुरवात; जिल्हाअंतर्गत बदल्या कायमच्या बंद?

राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास साडेतीन हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. त्यातील १० पेक्षा कमी पट असलेल्या दीड हजार शाळांचे आता एक किलोमीटरवरील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे.
schools
schoolssakal

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास साडेतीन हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. त्यातील १० पेक्षा कमी पट असलेल्या दीड हजार शाळांचे आता एक किलोमीटरवरील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. दुसरीकडे अनेक शाळांचा पट तेथील शिक्षकांच्या बदलल्यानंतर कमी झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या कायमच्या बंद करण्याचा प्रस्ताव देखील शालेय शिक्षण विभागाने ‘ग्रामविकास’ला पाठविला आहे. नवीन शिक्षक भरतीनंतर त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या परिपत्रकानुसार २०२१-२२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ५४ लाख २४ हजार ७२३ विद्यार्थी होते. त्यात झेडपी शाळांमध्ये ४५ लाख ५८ हजार आठ विद्यार्थी, महापालिकांच्या शाळांमध्ये सहा लाख ८० हजार ४३१ तर नगरपालिकांच्या शाळांमध्ये एक लाख ८६ हजार २८४ विद्यार्थी होते.

२०२२-२३मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या साडेतीन लाखाने कमी झाल्याचे समोर आले. त्यात विशेषतः जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांचीच पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमधील पटसंख्या मागच्या वर्षी जवळपास १५ हजाराने कमी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या २७४ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असून त्यातील ४३ शाळांमध्ये दहा देखील विद्यार्थी नाहीत. राज्यातील ही वस्तुस्थिती पाहता शिक्षक भरतीत देखील पदांची संख्या वाढण्याऐवजी कमीच होईल, असेही सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पुढील आठवड्यात ‘पवित्र’ पोर्टल उघडणार

राज्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६७ हजार रिक्त पदांपैकी ३० हजार पदांची भरती केली जाणार आहे. परंतु, शाळांची घटलेली पटसंख्या आणि अंतिम बिंदूनामावलीनुसार केवळ १५ ते १८ हजारांपर्यंतच शिक्षकांची भरती होऊ शकते, अशी स्थिती बिंदूनामावलीतून समोर आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. सर्व जिल्हा परिषदांची बिंदूनामावली आता अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरु होणार आहे. त्यावर पहिल्यांदा उमेदवारांना प्रोफाइल तयार करून घ्यावे लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.

शाळांचे समायोजन अन् विद्यार्थ्यांची पंचाईत

शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी असूनही त्याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्यात १ ते २० पटसंख्येच्या शाळांची संख्या २७४ असून ५१ ते १०० पटसंख्येच्या शाळा ४४३ आहेत. त्याठिकाणी पट कमी अन् शिक्षक जास्त, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील शिक्षकांना पट जास्त असलेल्या शाळांमध्ये पाठविले जाणार आहे. परंतु, घरापासून जवळ असलेल्या शाळा आता एक किलोमीटरवरील शाळांमध्ये समाविष्ट होणार असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे. त्या मुलांसाठी शासनाकडून पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com