मोठी बातमी! ‘टीईटी’ ऑनलाइन घेणेच सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबरअखेर परीक्षेचे नियोजन, वाचा...

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याने आता यापुढील परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार परिषदेने शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. ऑनलाइन परीक्षा सुरक्षित राहील, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
TET Exam

TET Exam

esakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याने आता यापुढील परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार परिषदेने शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. ऑनलाइन परीक्षा सुरक्षित राहील, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

‘टीईटी’चा पेपर फुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. पुढील वर्षापासून सर्व शासकीय परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी ‘टीईटी’ ऑनलाइन घेण्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रस्तावावर या समितीकडूनच निर्णय होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील ‘टीईटी’साठी विलंब होऊ नये म्हणून आगामी परीक्षा ऑनलाइनच होईल. त्यावरील अंतिम निर्णय पुढील १५ दिवसांत होणार असून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मागच्यावेळी ज्या उमेदवारांनी ‘टीईटी’साठी अर्ज केले, त्यांना आता ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा केंद्रांची निश्चिती करून त्याठिकाणी सगळीकडे सीसीटीव्ही आहेत का, याची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमार्फत खात्री केली जाणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी एक-दीड तास आधी प्रश्नपत्रिका ऑनलाइन प्रत्येक केंद्रावर पाठविली जाणार आहे. त्याठिकाणी झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जातील. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

अंतिम निर्णयानंतर नियोजन

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑनलाईन घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला पाठविला आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय काही दिवसांत होईल, त्यानुसार आम्ही परीक्षेचे नियोजन करू.

- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

२०२६-२७ वर्षात एकदाच ‘टीईटी’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५३ वर्षांपर्यंतच्या सर्व शिक्षकांना (इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षक) ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षकांना दोन वर्षांच्या मुदतीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दरवर्षी केंद्र सरकारतर्फे ‘सी-टीईटी’ तर राज्य सरकार ‘टीईटी’ घेतली जाते. दरवर्षी साधारणत: एक ‘सी-टीईटी’ पार पडते. मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वर्षात दोनदा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने २०२६-२७ या वर्षात एकदाच ‘टीईटी’ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com