

तात्या लांडगे
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा उद्यापासून (मंगळवारी) सुरु होत आहे. १० फेब्रुवारीला बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर इंग्रजीचा आहे. उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा मिळणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ८७५ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देतील. या परीक्षेसाठी ११९ केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर व केंद्रातील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ४० भरारी पथके असणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक देखील राहील. विद्यार्थ्यांना बरोबर साडेदहा वाजण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. वर्गात विद्यार्थी सोडताना त्यांची अंगझडती होईल.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील. बरोबर पेपर सुरु होण्याच्या वेळेत उत्तरपत्रिका वितरित होतील. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वाटपासाठी १० मिनिटे लागतात म्हणून तेवढा वेळ वाढवून देण्याचा निर्णय बोर्डाने यापूर्वीच घेतला आहे. दरम्यान, कॉपी केस आढळणाऱ्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार असल्याचा इशाराही बोर्डाने दिला आहे.
अशा वाजणार बेल...
वॉर्निंग गजर : अर्धा तास आधी
उत्तरपत्रिका वाटप : १० मिनिटे अगोदर दोन टोल
प्रश्नपत्रिका वाटप : बरोबर पेपर सुरु होण्याच्या वेळी दोन टोल
एक तास : दोन टोल
दोन तास : दोन टोल
दहा मिनिटे बाकी : एक टोल
लेखन समाप्त : १० मिनिटे जादा झाल्यावर
पर्यवेक्षकांसाठी सूचना...
परीक्षा दालनात ज्या क्रमाने परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षेचा कालावधी संपल्यावर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करायच्या आहेत. तशा सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परीरक्षक व केंद्रसंचालकांनी द्याव्यात, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.