मोठी बातमी! राज्यात आता 5 वर्षे होणार नाही शिक्षक भरती! संचमान्यतेचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय, माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील 20,000 शिक्षक अतिरिक्त
तात्या लांडगे
सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील संचमान्यतेनुसार पटसंख्येअभावी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ८,६०० शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यांचे समायोजन एप्रिलपासून सुरु होईल. दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तीन टक्के पदे रिक्त होतात. पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पहाता, पुढील पाच वर्षे शिक्षक भरती होणार नाही, अशी सद्य:स्थिती असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा सुधारित आदेश काढला. त्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. पण, न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसार संचमान्यता करण्यात आली. दरवर्षी राज्यातील अडीच ते तीन लाख उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देतात. पहिली ते आठवीच्या वर्गांवरील नेमणुकीसाठी ‘टीईटी’ तर त्यापुढील वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’चे बंधन आहे. त्यासाठीही एक-दीड लाख उमदेवार असतात.
संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांशिवाय जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे १५ हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. दरम्यान, २०२२-२३ मध्ये पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती झाली. दुसरीकडे संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे आता ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी चार-पाच वर्षे वाट पहावी लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.
शिक्षक समायोजनानंतर समजतील रिक्त पदे
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचमान्यता पूर्ण झाली आहे. २०२५-२६ वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल. समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे समजतील.
- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे
माध्यमिक शाळांची सद्य:स्थिती
एकूण शाळा
१७,२६५
कार्यरत शिक्षक
१,७०,०००
एकूण विद्यार्थी संख्या
९० लाख
अतिरिक्त होणारे अंदाजे शिक्षक
८,६००
समायोजनाची प्रक्रिया अशी असणार...
पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे सुरवातीला सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्याच जिल्ह्यात समायोजन होईल. त्यानंतर विभाग स्तरावर आणि शेवटी राज्यात कोठेही (ज्या शाळांमध्ये पदे रिक्त तेथे) समायोजन केले जाईल. इयत्ता दहावी-बारावी बोर्ड परीक्षा व नववीपर्यंतच्या परीक्षा संपल्यावर म्हणजेच १ एप्रिल ते १५ जून २०२६ पूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईल, असे माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

