मुंबई : राज्यात अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरात हिंसाचार झाला. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण (Amravati Violence) लागल्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एका मराठी गाणं म्हणत खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे.
''अमरावतीमध्ये दंगल उसळली. अचानक हजारो लोक एकत्र येऊन मोर्चे कसे काढतात? याबाबत सरकारला काहीही माहिती नाही असं कसं होऊ शकतं. या मोर्च्यामध्ये निवडून निवडून हिंदूंची दुकानं फोडली जातात. पण, हिंदूंची दुकानं जाळली गेली तेव्हा महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का?'' असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
संजय राऊतांना टोला -
फडणवीसांनी मराठी गाण्याचा उल्लेख करत हिंदूत्वावरून संजय राऊतांना टोला लगावला. ''कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू?'' असं फडणवीस संजय राऊतांना म्हणाले. संजय राऊत म्हणतात, भाजपने दंगल घडवून आणली. ते असं कसं बोलू शकतात, असं फडणवीस म्हणाले. तसेच नवाब मलिकांवर देखील त्यांनी टीका केली. नवाब मलिकांचा काही प्रश्नच नाही. हर्बल तंबाखूमुळे ते काहीही बोलतात. त्यांना त्यासाठीच ठेवलं आहे. या दंगलीचा आरोप सरकारवर येऊ नये म्हणून कव्हर फायरींगसाठी नवाब मलिकांनी तसं वक्तव्य केलं, असा आरोपही फडणवीसांनी केला.
''त्रिपुरामध्ये अत्याचार होत आहे, असं ट्विट ८ नोव्हेंबरला राहुल गांधी करतात. लगेच ११ नोव्हेंबरला मालेगाव, नांदेडमध्ये मोर्चे निघतात. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना हजारो लोक मोर्चा कसा काय काढतात? नियोजन न करता मोर्चा कसं काढू शकतात. नियोजन झालं तर सरकारला माहिती नाही का? हा देशातील पोलरायझेशनचा प्रयोग आहे'', असंही फडणवीस म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.