
नाशिक : शिवसेना (shivsena) सावरकरांची कसली वारसदार? त्यांना लाज वाटली पाहिजे. दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले. तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्य म्हणतात, हा निर्लज्जपणा आहे. अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.४) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे. साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan) नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यावं असा आग्रह काही मंडळींनी धरला होता. मात्र, तो नाकारण्यात आला. त्यावरून वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी आज नाराजी व्यक्त करत ट्विट केलं आहे.
साहित्यनगरीला सावरकरांचे नाव न वापरण्याचा हट्ट कशासाठी?
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देत केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? सावरकर यांचे योगदान मोठे आहे, गती असलेले ते साहित्यिक होते, त्यांचे नाव देऊ नये म्हणून कुसुमाग्रज यांचे नाव दिले. असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली.
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच...पण...
नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.
तर तेथे जाऊन तरी काय करायचे?
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?
निमंत्रणावरून रंगला होता वाद
संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं नाव नसल्यानं नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडं नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस संमेलनाला उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा होती. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी संमेलनाला उपस्थित राहण्याचं मान्यही केलं होतं. मात्र, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.