पक्ष सोडणार नाही, पण विधानसभेत जनतेसाठी आवाज उठविणारच : खडसे

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यमंत्रिमंडळातून बाहेर असलेल्या एकनाथ खडसेंनी याबाबत आपली भूमिका नेहमीच आक्रमकपणे मांडली आहे. आजही 'सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष सोडण्याबाबत इन्कार करतानाच जनतेच्या प्रश्नांबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात न्याय मागणार असल्याची भूमिका मांडली. 

माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सरकारनामा फेसबुक लाइव्ह द्वारे आज मनमोकळा संवाद साधला सकाळच्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांना बोलते केले. 

त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी - 

प्रश्‍न : उत्तर महाराष्ट्रातील विकासपुरुष आणि लोकनेते म्हणून आपणास पुन्हा मंत्रिपदी पाहू शकतो का? 
खडसे : अडीच वर्षांपासून मी मंत्रिमंडळाबाहेर आहे. मला मंत्री करायचे की नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. माझ्याबाबत पक्ष काहीतरी विचार करीत असेल, त्याबद्दल पक्षनेतृत्वच माहिती देऊ शकेल. यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी ठरवू शकत नाही. माझी आतापर्यंतची तपश्‍चर्या वाया जाणार नाही. 

प्रश्‍न : आपल्या पक्षांतराबाबतही चर्चा उठत असतात? 
खडसे : मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाची 40 वर्षे सेवा केली, हा पक्ष मी वाढविला. आणि या 40 वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर मी पक्ष सोडेल, असे मुळीच नाही. तसा विचारही मी करु शकत नाही. मात्र, असे असले तरी आपण विधीमंडळ अधिवेशनात जनतेच्या प्रश्‍नाबाबत आवाज उठविणार आहोत. 

प्रश्‍न : अंजली दमानियांच्या आरोपांबाबत आपली भूमिका काय? 
खडसे : दमानिया प्रकरण आपोआप आलेले नाही, ते माझ्यामागे लावून दिलेले प्रकरण आहे. त्यावेळी झालेल्या सर्व आरोपांची चौकशी पूर्ण झाली असून त्यात कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. ही प्रकरणे म्हणजे केवळ नाथाभाऊला बदनाम करण्याचा, नालायक ठरविण्याचा प्रकार होता. जर या प्रकरणांमध्ये मी दोषी असेल तर कारवाई करावी, अन्यथा मी निर्दोष असल्याचे जाहीर करावे, अशी आजही आपली भूमिका आहे.उलट अंजली दमानिया यांना अटक करण्याची कारवाई शासन करीत नसल्याचा आपला आरोप आहे. दमानीया यांनी आपल्या नावाने साडेनऊ कोटी रूपयांचे बनावट धनादेश काढले, ते बनावट असल्याचे सिध्द झाले,जिल्हा पोलीस अधिक्षकानीही ते बनावट असल्याचा अहवाल दिला.या प्रकरणी तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याबाबत आपण न्यायालयात गेलो न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला,त्यानंतर गुन्हा दाखल झाला, मात्र आजही दमानीया यांना अटक झालेली नाही. तपासअधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे परवानगी मागितली असता. त्यांची बदली केली जाते, त्यांना छळल जात.जर आरोपी आहे तर त्या आरोपीला अटक करण्यासाठी परवानगी मागावी का मागावी लागते? याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगितले, मुख्यमंत्री म्हणतात मी जिल्हा पोलीस अधिक्षकांना सांगितले आहे. मग जिल्हा पोलीस अधिक्षक अटकेची कारवाई का करीत नाही? ते मुख्यमंत्र्याचेही ऐकत नाहीत. ही भूमिका योग्य आहे असे आपल्याला वाटत नाही.याबाबत आपण विधानसभेत न्याय मागणार आहोत. 

प्रश्‍न : 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होता, त्याबद्दल काय? 
खडसे : सर्वसाधारणपणे विरोधी पक्षनेत्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून पाहिले जाते. तसे मानणे आणि तशी अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. मात्र, त्यावेळी पक्षाने घेतलेला निर्णय आपण स्वीकारला. तरीही सरकारने माझ्याकडे महत्त्वाच्या 12 खात्यांचा कार्यभार सोपविला आणि तो मी समर्थपणे पेलला. 

प्रश्‍न : आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील लोकहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होताना दिसत नाही? 
खडसे : मंत्रिपदी असताना मी विविध विभागांशी संबंधित 119 निर्णय घेतले. महसुली जमिनींचे वर्षानुवर्षे रखडणारे दावे एका वर्षांत निकाली काढणे, वारसांच्या नावावर वर्ग करण्याला मुद्रांक शुल्क माफ, ऑनलाइन सातबारा व सजांच्या निर्मितीचा निर्णय, वक्‍फ बोर्डाच्या जमिनी असे अनेक निर्णय घेतले. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #सरकारनामा #SarkarnamaDiwali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com