५० वर्षांचे जुन्या दोन्ही कालव्यांची होणार दुरुस्ती! ‘उजनी’वरील कालवा दुरुस्तीसाठी २२५ कोटींचा प्रस्ताव; लाखो लिटर पाण्याची गळती थांबणार

५० वर्षांपूर्वीच्या जुनाट कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ७०० कोटींची गरज आहे. परंतु, निधीच्या उपलब्धतेनुसार आता ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’मधून २२५ कोटी मिळावेत, असा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी सरकारला सादर केला आहे.
Ujani Dam
Ujani Damsakal

सोलापूर : उजनीतून शेतीला डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडताना जुनाट नादुरुस्त कालव्यांमुळे (कॅनॉल) प्रत्येक आवर्तनावेळी लाखो लिटर पाणी वाया जाते ही वस्तुस्थिती आहे. ५० वर्षांपूर्वीच्या जुनाट कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ७०० कोटींची गरज आहे. परंतु, निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्वीचे प्रस्ताव बाजूला सारून आता ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’मधून २२५ कोटी मिळावेत, असा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी सरकारला सादर केला आहे.

सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यातील अंदाजे दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना उजनी जलाशयाचा लाभ झाला आहे. रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात उजनीमुळे दीड लाख हेक्टरवर ऊस असून त्यामुळे जिल्ह्यात ४३ साखर कारखाने उभारले आहेत. त्यातून हजारो हातांना रोजगारही मिळाला आहे. जून १९८०मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले.

तत्पूर्वी, धरणातून शेतीला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून डावा व उजव्या कालव्याची उभारणी झाली. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून लहान-मोठ्या कॅनॉलला सिमेंट काँक्रिटही केले आहे. धरणातून दरवर्षी रब्बी व खरीप हंगामासाठी किमान दोन-तीन आवर्तने सोडली जातात. परंतु, जीर्ण झालेल्या कालव्यांमुळे पाणी ‘टेल टू एण्ड’ पोचायला विलंब होतो आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. आता निधी उपलब्ध झाल्यावर ही अडथळ्यांची शर्यत संपणार आहे.

उजनीचा दोन लाख हेक्टर जमिनीला आधार

धरणावरील कालव्यांद्वारे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दुसरीकडे सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गतही अंदाजे ३८ हजार हेक्टर सिंचनाखाली आले आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायती, नगरपरिषदा, सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूर व बारामती या शहरांनाही उजनीचाच आधार आहे. धरणामुळे अनेकदा जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता कमी झाली आणि शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावण्यास मदत झाली आहे.

ठळक बाबी...

  • - धरणाचे काम पूर्ण : जून १९८०

  • - साठवण क्षमता : ११७ टीएमसी

  • - डावा कालवा : १२६ कि.मी.

  • - उजवा कालवा : १३२ कि.मी.

  • - सिंचनाखालील क्षेत्र : २ लाख हेक्टर

प्रस्तावातील ठळक बाबी...

  • उजनीवरील मुख्य डावा व उजवा कालव्यावरील गळती होणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती आवश्यक

  • डाव्या कालव्यावरील (कारंबा शाखा) कुरुल, बेगमपूर, मोहोळ शाखा कालव्यांची दुरुस्ती गरजेची

  • धरणावरील उजवा कालव्यासह इतर वितरिकांचीही दुरुस्ती केल्यास पाण्याची थांबेल गळती

  • निधीतून गळतीच्या ठिकाणी नवीन बांधकाम व दुरुस्ती होऊन पाण्याची बचत होईल आणि विसर्ग सुरळीत व वाढेल.

निधी मिळाल्यास पाण्याचा अपव्यय टळेल

‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’मध्ये उजनी जलाशयाचाही समावेश आहे. त्याअंतर्गत धरणावरील उजवा व डावा कालवा, शाखा कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी २२५ कोटींचा निधी मिळावा म्हणून सुधारित प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. त्या निधीतून कालव्यांची दुरूस्ती होऊन पाण्याची गळती थांबण्यास मदत होईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com