ब्रेकिंग! शेतीसाठी उजनीतून ‘या’ दिवशी सुटणार पाणी; 'कालवा सल्लागार'ची आज बैठक; सोलापूरला पाणी सोडण्यासाठी महापालिकेचेही पत्र

१ नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडण्यास तत्वत: मान्यता मिळाली होती, पण अजून पाणी सोडलेले नाही. शुक्रवारी (ता. ३) त्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक आहे. त्यातील निर्णयानुसार ४ नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
उजनी धरण
उजनी धरण Gallery

सोलापूर : खरीप वाया गेला, आता रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची मोठी गरज आहे. अनेक तालुक्यांमध्ये अपेक्षित पेरण्या देखील झालेल्या नाहीत. १ नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडण्यास तत्वत: मान्यता मिळाली होती, पण अजून पाणी सोडलेले नाही. शुक्रवारी (ता. ३) त्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक आहे. त्यातील निर्णयानुसार ४ नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनीत सध्या एकूण साठा ९२.७९ टीएमसीपर्यंत आहे, पण त्यात १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळच आहे. तर दहा ते १५ टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवले जाते. त्यात पुन्हा बाष्पीभवनातून आठ टीएमसीपर्यंत पाणी जाते. आता धरणातील ५० टीएमसी पाणी वापरात येवू शकते. त्यात शेतीसाठी दोन, पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी एक आवर्तन आणि उर्वरित पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे.

जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच बैठकीत शेतीसाठी १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यास तत्वत: मान्यता मिळाली. परंतु, अजून अंतिम निर्णय झालेला नाही. अडचणीतील बळिराजाला प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. धरणातील साठा कमी झाल्यानंतर शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे जानेवारीअखेरीस शेतीला दुसरे आवर्तन आणि तत्पूर्वी, ४ नोव्हेंबरपासून शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडले जाईल. ते पाणी तब्बल ३० ते ३५ दिवस राहणार असल्याचेही लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीदेखील, कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणी सोडण्यासाठी महापालिकेचेही पत्र

सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो. पण, सध्या औज बंधाऱ्यातील पाणी तळाशी गेले आहे. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत बंधाऱ्यात पाणी पोचेल, यादृष्टीने उजनी धरणातून पाणी सोडावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे. शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडल्यानंतर १ डिसेंबरपासून धरणातून सोलापूर शहरासाठी देखील भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून सुरु आहे.

‘औज’मधील अवैध उपसा कधी बंद होणार?

उजनीतून भीमा नदीद्वारे औज बंधाऱ्यात सोडलेले पाणी सोलापूर शहरासाठी ५५ ते ६० दिवस पुरते. पण, धरणातून नदीद्वारे इंडी, कर्नाटकातील शेतकरी विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा करतात. दुसरीकडे बंधाऱ्यातील पाणी इंडीतूनही मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा होतो. अधिकाऱ्यांच्या पाहणीत त्यावर शिक्कामोर्तब देखील झाले. परंतु, त्यासंदर्भात अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी ५० दिवसापर्यंतच पुरते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com