24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू; सरकारी घोषणा नाही
मुंबई - विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीसह विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणुका होत असल्याने राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. यामुळे 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाल्याने सरकारच्या वतीने कोणत्याही घोषणा केल्या जात नसल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.
राज्यातील दोन लोकसभा, तर एका विधानसभा मतदारसंघात 28 मे 2018 रोजी पोटनिवडणूक होत आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार मतदारसंघांसाठी येत्या 8 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, विधान परिषदेवरच निवडून द्यावयाच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 21 रोजी मतदान होत आहे. यामुळे राज्यात तब्बल 24 जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली असल्याने संपूर्ण राज्यात निवडणुकांचा माहोल तयार झाला आहे. कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस वगळता अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे मानण्यात येते. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकांचा निकाल घोषित होईपर्यंत सांगली जिल्ह्यातील आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
येथे होणार निवडणुका...
- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
- विधान परिषदेत निवडून द्यायाच्या जागा - नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर मतदारसंघ; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती आणि उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ
या जिल्ह्यांत आचारसंहिता लागू
नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली. |
|