रायगडाच्या संवर्धनासाठी विशेष तटबंदी ! 

रायगडाच्या संवर्धनासाठी विशेष तटबंदी ! 

मुंबई - रायगड किल्ला आणि परिसरात सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमांतून पर्यटन विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. त्यांना पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. रायगड किल्ल्याभोवती विशेष तटबंदी, किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष कौशल्य असणारे कारागीर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध करून देणे; तसेच सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन विभागाच्या विश्रामगृहाची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगड आणि परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. ही समिती रायगड विकासाबाबत निर्णय घेते. त्याची अंमलबजावणी सरकारचे विविध विभाग करीत आहेत. समितीने रायगडाच्या विकासासाठी 607 कोटींचा विकास आराखडा मंजूर करून, 31 मार्च 2017 रोजी अध्यादेश जारी केला. त्यानंतर कामे नियमित सुरू झाली आहेत. यात पुरातत्त्व खाते, बांधकाम, पर्यटन, सांस्कृतिक आणि नियोजन विभाग सक्रिय आहेत. 

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन खाते; तसेच भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यासोबत दिल्ली येथे 2017 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाची बैठक झाली. त्यात रायगड किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि इतर बांधकामांना मान्यता देण्यात आली. त्यानुसार पुरातत्त्व विभागाशी संबंधित 118 कोटींच्या विकासकामांना परवानगी देण्यात आली. पर्यटन विभागाशी झालेल्या चर्चेत अनेक निर्णयांवर मोहोर उठविण्यात आली. यात रायगड किल्ल्याभोवती विशेष तटबंदी, किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष कौशल्य असणारे कारागीर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध करून देणे; तसेच सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन विभागाच्या विश्रामगृहाची दुरुस्ती इत्यादींचा समावेश आहे. 

दृष्टिक्षेपात आराखड्यात मंजूर कामे 

आराखड्यातील कामे व खर्च (कोटी रुपयांत) 
- भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केली जाणारी कामे ः 124.14 
- रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी, वाडा परिसरातील कामे ः 49.52 
- परिसरातील पर्यटनाशी संबंधित कामे ः 78.91 
- परिसरातील मूलभूत सुविधा (21 गावांचा परिघ) ः 43.60 
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे ः 206.04 
- भूसंपादन ः 25.00 
- रज्जू मार्ग अर्थात रोप वे ः 50.00 
- तातडीचा खर्च ः 28.86 

अनेक कामे प्रगतिपथावर 
पुरातत्त्व विभागाकडून रायगडावर दोन महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. यात अनेक शिवकालीन अवशेष सापडले. रोप वे अपर स्टेशन ते कुशावर्त तलाव होळीचा माळ कामाला सुरुवात झाली आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची कामे तीन टप्प्यांत होणार आहेत. दोन टप्प्यांतील कामे सुरू करण्यासाठी स्वच्छता करण्यात आली आहे. रायगडावरील पाण्याच्या शिवकालीन टाक्‍यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. 21 टाक्‍या स्वच्छ झाल्यामुळे पुढील वर्षापासून 20 लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध होईल. जगदिश्‍वर मंदिराची स्वच्छताही झाली आहे. 

निविदा प्रक्रियेतील कामे 
रायगडावरील पर्यटकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासाठी जुन्या योजनेच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेनंतर त्याचे अंदाजपत्रक बनेल. रायगडावरील राजसदर, राणीवसा, बुरूज, राजवाडा अशा ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. पर्यटकांसाठी सुविधा, पोलिस चौकी, निवास व्यवस्था, राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे संवर्धन, पाणीपुरवठा योजना, ध्वनी व प्रकाश योजना, पाचाड येथे शिवसृष्टी, रायगड परिक्रमा मार्ग, रज्जूमार्ग अशी कामे आराखड्यात असली, तरी सद्यस्थितीत प्रस्ताव आणि निविदा प्रक्रियेत हा आराखडा अडकला आहे. वेगवेगळ्या सूचनांमुळे आराखड्यातील कामांतही बदल केले जात आहेत. ही कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com