पंढरपूर - मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू न देण्याचा निर्धार आज मराठा क्रांती मोर्चाच्या आज येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिली.
येथील श्रीराम मंगल कार्यालयात आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक झाली, या बैठकीस कोपर्डी येथील पीडित भगिनीचे आईवडिलांसह पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. या बैठकीतील विषयांची माहिती समन्वयक गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले, की मराठा समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात वेळोवळी मोर्चे काढण्यात आले. निवेदने देण्यात आली; परंतु अद्याप शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची पूजा करू न देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
आजच्या बैठकीत मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, संतांसह महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडे यांना तत्काळ अटक करावी, 36 हजार नोकरभरतीची अंमलबजावणी मराठा आरक्षणानंतर करावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
|