मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) राज्यात एक नंबरचे स्थान मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आगामी निवडणुकांत प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुका म्हणजे 2019 च्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जाते. त्यामुळे पुढील काळात मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागेल, असे राजकीय जाणकारांना वाटते.
राज्यात मागील दोन-तीन वर्षांत दोन-तीन टप्प्यांत झालेल्या महापालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत निवडणुका मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. या निवडणुकांत भाजपला चांगले यश मिळाले. त्याचे सारे श्रेय फडणवीस यांना जात आहे. त्यामुळे फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
भाजपचा कस लागणार
2019 च्या लोकसभा निवडणुकीला काही महिने अवधी उरला असताना सध्या राज्यात भंडारा-गोंदिया व पालघर या दोन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच, पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींतून निवडूण देण्याच्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी ही प्रचार सुरू आहे. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून निवडणूक द्यावयाच्या प्रतिनिधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम ही जाहीर झाला आहे. या निवडणुकांत भाजपचा कस लागणार आहे.
भाजपला खिंडीत गाढण्याचा प्रयत्न
शिवसेनेने पालघरमध्ये उमेदवार उभा करून प्रचार सुरू केला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. शिवसेनेने एकला "चलो रे'ची भूमिका घेत भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सूर ठेवला आहे. त्यामुळे भाजपला कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर शिवसेनेचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे भाजपची कसोटी लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांपुढे मोठे आव्हान
या निवडणुकीतील जय-पराजयाला वेगळे महत्त्व आहे. ही निवडणूक आगामी निवडणुकीच्या वातावरणाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना यश खेचून आणावे लागणार आहे. त्यांची पत कायम ठेवायची असेल, तर या निवडणुकांत मागील निवडणुकीप्रमाणे यश संपादन करावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान निर्माण झाल्याचे मानले जाते.
|