'मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवातच माफीने करावी' (व्हिडिओ)

'मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवातच माफीने करावी' (व्हिडिओ)

यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात निमंत्रणवापसी केलेल्या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका डॉ. नयनतारा सहगल यांची माफी मागावी, तसेच संमेलनातील पहिला ठराव त्यांच्या माफीनाम्याचा घ्यावा, असा अनाहूत सल्ला मंगळवारी (ता. आठ) माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी राज्य सरकार व आयोजकांना दिला.

साहित्य संमेलन दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना अनेक वादांना तोंड फुटत आहे. मानापमानाचे नाट्य रोजचा विषय झाले आहे. त्यात भर उद्घाटक म्हणून निमंत्रण दिलेल्या डॉ. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनीच मेल पाठवून रद्द केले. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असून अनेक साहित्यिकांनी या संमेलनावर टीका तर केलीच परंतु संमेलनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोजकांनी आपली भूमिका कालच जाहीर केली होती. त्यावर आज माजी मंत्री अ‍ॅड. मोघे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले की, संमेलन यशस्वीपणे पार पडावे ही यवतमाळवासींची इच्छा आहे. येथे 42 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून ही आनंदाची बाब आहे. निमंत्रण पत्रिका ठरली, सर्व कार्यक्रम जाहीर झाल्यावर निमंत्रण मागे घेण्यात आल्याची घटना दुर्दैवी आहे.


ज्येष्ठ महिला साहित्यिकाचा हा अपमान आहे. हा सर्व कारनामा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचा असल्याचा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध यजमान संस्थेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला बाबासाहेब गाडे पाटील, वासुदेव महल्ले व सिकंदर शहा उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com