
पीडिता आत्महत्येच्या वाटेवर; बलात्कारी नेत्यावर चित्रा वाघांकडून कारवाईची मागणी
मुंबई: शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या (BJP) उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांना याआधी ऐकवली होती. या तरुणीने कुचिक यांच्या आधीपासूनच आपल्यावर अत्याचार होत असल्याचा दावा करत अनेक मोठ्या लोकांची यात नावे घेतली होती. कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा ट्विटरद्वारे कारवाईची मागणी केली आहे. या घटनेतील पीडिता सध्या आत्महत्त्येच्या वाटेवर असून जर काही कारवाई झाली नाही आणि तिचं बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार हे सरकार असेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्या पीडितेने आत्महत्त्येचे प्रयत्न करत असल्याचे काही स्क्रीनशॉट्स देखील चित्रा वाघ यांनी पोलिस अधिकारी आणि गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहचवले आहेत. मात्र, जर कारवाई झाली नाही तर त्याला जबाबदार हे सरकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
यासंदर्भातील कारवाईची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचे पुण्यातील नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात न्यायाची मागणी करत म्हटलंय की, या बलात्कारीत नेत्याला दोनदा बेल मिळाला आहे. त्यानंतर तो ही केस मागे घे, असं म्हणत या मुलीला मॅसेज करतो आहे. तिला त्रास देतो आहे. 'हे मॅसेज कुणाला दाखवायचे त्याला दाखव मला काही फरक पडत नाही.', अशी त्याची भाषा आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? त्याच्या मागे कोण उभं आहे? या मुलीने या धमक्यांमुळे त्रासून आता स्वत:ला संपवत असल्याची फेसबुक पोस्ट टाकली आहे. अत्याचारीत तरूणीने फेसबुकवर पोस्ट करत कुठूनही न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करते असं लिहीलयं. पुणे पोलिसआयुक्त, सहआयुक्त, गृहमंत्री अशा सगळ्यांना कळवलयं. तसेच तिने केलेल्या फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट्स पाठवले आहेत. कित्येक फोन केले आहेत, मात्र, एकानेही उचलले नाहीत कि मॅसेज बघूनही रिप्लाय दिला नाही. जर तिच्या जिवाचं काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार तो कुचिक तर असेलच त्याचसोबत पुण्याचे पोलिस अधिकारी आणि राज्य सरकार देखील असेल. ती गेल्यावर मेणबत्ती घेऊन फिराल, तेंव्हा काही अर्थ उरणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
पुढे त्या म्हणाल्या की, जर तिच्या जिवाचं काही बरं-वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार सरकार व पोलिस असतील हे लक्षात ठेवा. मुलगी मेल्यावर सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होती. त्यामुळे तिच्या मरणाची वाट पाहू नका. वाचवा त्या मुलीला... असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Web Title: Chitra Wagh On Raghunath Kuchik Victim On The Verge Of Suicide Is The Government Asleep Demand For Action
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..