राज्यात तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करा - मुख्यमंत्री

‘‘आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल,’
uddhav thackeray
uddhav thackerayesakal

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा स्पष्ट सूचनाही ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या. कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.

‘‘आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल,’’ असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे. पण, त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा गरजेचा आहे.’’

uddhav thackeray
नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!

दिरंगाई नको

‘‘ऑक्सिजन प्लांट्सची जेथे गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे,’’ असे ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेनंतर तब्बल २८ कर्मचारी पॉझिटिव्ह

मजुरांची नोंद ठेवा

‘‘गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र, ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगधंदे थांबू नयेत

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाउन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत. त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केली आहे का हे पाहावे,’’ असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com