मुंबई : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं तसं कळवलं आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीच्या माहितीसाठी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.
नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
चार महिन्यात १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान
गेल्या चार महिन्यात राज्यात झालेल्या पावसामुळं आत्तापर्यंत १७लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी १७० ते १९० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. त्याचबरोबर ४३६ लोक बेपत्ता झाला होते. यांपैकी ४३० जणांचे मृत्यू झाले असून त्यांचे मृतदेह हाती आले तर अद्याप ६ जणांचे मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच १३६ जण यामध्ये जखमी झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.