ठाकरेंशी चर्चेनंतर काँग्रेसचे समाधान; पुरेसा निधी देण्याचे आश्‍वासन

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आज सरकारमधील कुरबुरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या.
cm uddhav thackeray
cm uddhav thackeray google

मुंबई : राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आज सरकारमधील कुरबुरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर ठाकरे यांनी, काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगत, तो मिळवून देण्याची जबाबदारी घेतल्याने काँग्रेस नेत्यांचे तूर्त समाधान झाल्याचे चित्र आहे. सरकार असतानाही कामात अडचणी येत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्यापुढे मांडला होता.

राज्यातील काँग्रेसच्या नेते, मंत्र्यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम, काँग्रेसकडील खात्यांसाठी निधी, काही प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी यावर चर्चा करून या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रारी केल्याचे सांगण्यात आले. ऊर्जा आणि इतर

खात्यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याचे गाऱ्हाणे काँग्रेसने याआधी मांडले होते. याबाबत नाना पटोले यांनी सांगितले की,‘‘राज्यात एकत्र काम करताना तिन्ही पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, दोन वर्षे झाल्यानंतरही मंत्र्यांच्या तक्रारी होत्या. त्यात निधी मिळत नसल्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यावर आमची भूमिका घेऊन गेल्यानंतर ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आणि निधी देण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे आता ही अडचण येणार नसल्याची आशा आहे. ऊर्जा खात्याला नेमके काय अपेक्षित आहे; हेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असून, सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.’’

आरोपांची चौकशी व्हावी

भाजप नेत्यांविरोधात शिवसेनेने उघडलेल्या मोहिमेला पाठिंबा असल्याचे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनुसार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह अन्य नेत्यांच्या गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना ताब्यात घेताना त्यांचे तोंड दाबलेल्या अधिकाऱ्याच्या चौकशीचीही मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

केवळ आरोपांचा कार्यक्रम

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपने सोमय्या यांच्याकडे केवळ आरोपांचा कार्यक्रम दिला आहे. त्यांचे आरोप खरे ठरत नाहीत. भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नसून, केवळ बदनामी करायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com