मुंबई - राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून केली आहे.
सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद 15 ते 19 जानेवारी 2019 या कालावधीत मुंबईत आयोजित केली आहे. या परिषदेच्या आयोजनावर होणारा करोडो रुपयांचा खर्च टाळून जास्तीत जास्त निधी दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर राज्य सरकारने भर देण्याची आवश्यकता आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सरकार दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदत पोचवण्याऐवजी इतर कार्यक्रमावर निधी खर्च करत आहे, हे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे विखे पाटील म्हणाले.
|