मुंबई : गेली सत्तर वर्षे वरच्या स्थानावर असलेला काँग्रेस (congress) आगामी काळात पुन्हा क्रमांक एकचा पक्ष (top ranking) होऊन तो सर्व पक्षांच्या वरचे स्थान मिळवेल, असे प्रत्युत्तर राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (naseem khan) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना दिले आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असले तरीही हे ठाकरे सरकार असून शिवसेनेचे स्थान सर्व पक्षांच्या वरचे आहे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, त्याचे सरकार ओळखले जाते, असे वक्तव्य राऊत यांनी पुणे जिल्ह्यात केले होते. राऊत यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे, त्यांनी अशी विधाने टाळायला हवीत, असाही टोला खान यांनी लगावला आहे. राऊत यांच्या विधानांना नसीम खान यांनी वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळाची भाषा केल्याने या तीनही पक्षांच्या आघाडीत विसंवाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री झाले आहेत. किमान समान कार्यक्रमानुसार हे सरकार चालते आहे. आघाडी सरकारमध्ये कोणीही पक्ष वर नाही व कोणीही खाली नाही, सर्व पक्ष समान आहेत. राज्यातील पक्ष कार्यकर्ते व नेते यांच्या इच्छेनुसार आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. किंबहुना आम्ही आमचा पक्ष वाढविण्यासाठीच ही पावले उचलीत आहोत. येणाऱ्या काळात काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष होईल व त्याचे स्थान सर्वात वरचे असेल, असेही खान म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.