औरंगाबाद : राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. त्यांनी लस घेतली नसल्यास अशांना नोटिस व काही दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर मात्र वेतनात कपात करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही दोन्ही डोस पूर्ण करावे अन्यथा महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या २ हजार ८८ जागा तातडीने भरण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत. या भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत ७३ प्राध्यापकांची भरती केली जाणार असून याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. पूर्वीच्या पद्धतीनुसार, संवर्गनिहाय अथवा ‘एमपीएससी’द्वारा भरती करावी, याबाबत स्पष्टता नसून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेतील. त्यानंतर हा निर्णय होईल. विद्यापीठस्तरावर आलेल्या तक्रारींची दखल घेत काहींचा निपटारा केला आहे. आरक्षण बदलून नियुक्त्या झाल्याच्या प्रकरणात एक बाजू ऐकली, दुसरी बाजू जाणून दोन्ही तक्रारींवर समिती निर्णय घेऊन माझ्याकडे अहवाल देतील, असेही सामंत यांनी सांगितले.
संतपीठाच्या अभ्यासक्रमाबाबत ‘अभ्यास’
संतपीठासाठी ९० जागांची मागणी केली असून त्यातील ७५ जागा भरल्या आहेत. या जागांबाबत १५० लोकांनी चौकशी केली असून अभ्यासक्रम कसा असावा, याबाबत आम्ही विचार करीत असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.