पीकविमा कंपनी मालामाल? शेतकरी, केंद्र व राज्याकडून कंपनीला 321 कोटींचा हिस्सा, पण शेतकऱ्यांना मिळाले फक्त 105 कोटी; तूर, कांदा, भुईमूग, कापसाला पीकविम्याची प्रतीक्षाच

सोलापूर जिल्ह्यातील 7,01,640 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरविला. विमा कंपनीला राज्याकडून 188.41 कोटी तर केंद्राकडून 132.81 कोटीचा हिस्सा मिळाला. दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 रुपया, असे एकूण 321.29 कोटी रुपये विमा कंपनीला मिळाले. त्यापैकी अवघे 105 कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : ‘एक रुपयात पीकविमा’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात लाख एक हजार ६४० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरविला. जिल्ह्यासाठी विमा कंपनीला राज्य सरकारकडून १८८ कोटी ४१ लाख रुपये तर केंद्राकडून १३२ कोटी ८१ लाख रुपयांचा हिस्सा मिळाला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक रुपया, असे एकूण ३२१ कोटी २९ लाख रुपये विमा कंपनीला मिळाले. मात्र, त्यापैकी अवघे १०५ कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून उर्वरित २१६ कोटी रुपयांमधील एक दमडीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील बाधित एक लाख ७० हजार ९४५ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम दिला. आतापर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाईपोटी १०५ कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. पण, अद्याप तूर, कांदा, भुईमूग, कापूस या पिकांसाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळालेली नाही. या पिकांना भरपाई द्यायची की नाही, हा विषय कृषी आयुक्तांपासून मंत्री आणि पुढे केंद्र सरकारपर्यंत पोचला. त्याठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भातील आदेश झाले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असतानाही सर्व बाधित शेतकऱ्यांना ना दुष्काळातील भरपाई मदत ना पीकविम्याचे पैसे, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.

नुकसानीचे पंचनामे अन्‌ पीक कापणीनंतरही भरपाईची प्रतीक्षाच

अतिवृष्टी व पावसाचा खंड, यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील जवळपास ८० हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे त्यासंबंधीची पूर्वसूचना दिली होती. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा-सात महिने झाले आहेत. दुसरीकडे खरीप पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी पीक कापणी प्रयोगानंतर मिळते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग देखील झाले, पण अद्याप या शेतकऱ्यांना भरपाई काहीही मिळालेली नाही.

सर्व बाधित शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी पाठपुरावा

खरीप हंगामात शेती पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरु आहे. नुकसानीची पूर्वसूचना दिलेले शेतकरी व पीक कापणी प्रयोगानंतर ज्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना भरपाई अपेक्षित आहे.

- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

पीकविम्याची जिल्ह्यातील स्थिती

  • पीकविमा भरलेले शेतकरी

  • ७,०१,६४०

  • राज्य सरकारचा हिस्सा

  • १८८.४१ कोटी

  • केंद्र सरकारचा हिस्सा

  • १३२.८१ कोटी

  • विमा कंपनीकडील एकूण रक्कम

  • ३२१.२९ कोटी

  • शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई

  • १०५ कोटी

  • भरपाई मिळालेले शेतकरी

  • १,७०,९४५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com