मोठी बातमी ! ग्रामपंचायतींवरील प्रशासक होण्यासाठी बेरोजगारांची गर्दी; 55 हजारांहून अधिक तरुण इच्छुक

grampanchayt
grampanchayt

सोलापूर : राज्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींवर संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच त्या गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय 13 जुलैला झाला. लॉकडाउनमुळे हातातील काम गेल्याने गावाकडे आलेल्या व रोजगाराच्या शोधात असलेल्या 35 हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली तर 20 हजार पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासक काम करण्याची इच्छा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. 

राज्यातील 19 जिल्ह्यांतील एक हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जूनमध्ये संपली असून 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत संपणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी (उदा. : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण आदी) आरक्षित होते, त्याच प्रवर्गातील व्यक्‍तीला संधी दिली जाणार आहे. तर यापूर्वी मुदत संपल्याने प्रशासक म्हणून नियुक्‍त केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती रद्द करण्याचाही निर्णय झाला. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत 35 हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तर 20 हजारांहून पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासक पदासाठी संबंधित पालकमंत्र्यांकडे इच्छा व्यक्‍त केल्याचे ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव परमेश्‍वर इंगोले यांनीही तशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल पाहून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची निवड करण्याचे महाविकास आघाडीने ठरवून घेतल्याची चर्चा आहे. 

राज्यातील ग्रामपंचायतींची सद्य:स्थिती 

  • मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे जिल्हे : 19 
  • मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती : 12,234 
  • प्रशासक पदासाठी अंदाजित इच्छुक : 45,000 
  • इच्छुक सुशिक्षित बेरोजगार : 75 टक्‍के 


प्रशासक म्हणून योग्य व्यक्‍तीचीच होईल निवड 
याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल झाले. मात्र, प्रशासक नियुक्‍तीसाठी तसे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गावचा कारभार सुरळीत चालावा, नागरिकांचे प्रश्‍न सुटावेत या हेतूने मुदत संपलेल्या व संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्‍तीचीच निवड केली जाईल. आतापर्यंत सुमारे साडेबाराशे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्‍तीची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण इच्छुक आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com